रस्त्याच्या कामात घोटाळा, शिवसेनेच्या मंत्र्याचे गडकरींना पत्र !

रस्त्याच्या कामात घोटाळा, शिवसेनेच्या मंत्र्याचे गडकरींना पत्र !

मुंबई – सध्या मुंबई गोवा चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. त्यामुळे भविष्यात या मार्गावरील अपघातात अधिक वाढ होण्याची शक्यता आहे. भविष्यातील वाढते अपघाताचे प्रमाण टाळायचे असेल तर, या महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाबाबत आपल्या स्तरावरून चौकशी करण्यात यावी, असे पत्र रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री तसेच गृहनिर्माण, उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री रविंद्र वायकर यांनी परिवहन व महामार्ग केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पाठविले आहे. नुकत्याच कोकणात करण्यात आलेल्या दौर्‍यात ही बाब राज्यमंत्र्याच्या निदर्शनास आली आहे.

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण हा केंद्र शासनाकडून प्रकल्प मंजुर असून त्याची अंमलबजावणी सुरू झालेली आहे. यासाठी आवश्यक जमिनी संपादन करण्यात आली असून महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील गावांच्या संख्येत, शहरांतर्गत वाहतुकीत झालेली वाढ विचारात घेता दळणवळणासाठी चांगले दर्जाचे रस्ते जनतेस उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. रत्नागिरी जिल्ह्याची भौगोलिक स्थिती ही उंच डोंगर पर्वत, कातळ भागाची मैदाने व जिल्ह्याच्या पूर्व भागात सह्याद्रीची उंच भिंत असल्यामुळे तसेच तेथे पडणार्‍या पर्जन्यमानाचे प्रमाण हे खुप जास्त आहे. त्यामुळे येथे अस्तित्वात असणार्‍या रस्त्यांची दुरावस्था लवकर होत असल्याचेही रत्नागिरी जिल्हा पालकमंत्री वायकर यांनी पत्रात नुमद केले आहे.

तसेच जिल्ह्याच्या दौर्‍यावेळी चौपदरीकरणाच्या कामाची पाहणी केली असता सध्या चौपदीकरणाचे सुरू असलेले काम निकृष्ट होत असल्याचे वायकर यांच्या निदर्शनास आले आहे. केवळ मातीचे थर देवून त्यावर क्रॉंक्रीटीकरण केले जात आहे. सध्या तयार करण्यात येत असलेल्या रस्त्याचा पायाच मजबुत नसल्याने मुसळधार पावसात ही माती वाहून जाऊ शकते. माती रस्त्यावर आल्यास मुंबई-गोवा महामार्गाच्या वाहतुकीवर याचा विपरित परिणाम होऊ शकतो. या महामार्गावर अगोदरच अपघाताचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच या महामार्गावरील चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्यास या मार्गावरील अपघाताच्या प्रमाणात अधिक वाढ होऊ शकते. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची गुणवत्ता व दर्जाची आपल्यास्तरावरुन चौकशी करण्यात यावी, अशी विनंतीही रविंद्र वायकर यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना लेखी पत्राद्वारे केली आहे.

COMMENTS