शिवसेना फरफटत जाणार नाही – उध्दव ठाकरे

शिवसेना फरफटत जाणार नाही – उध्दव ठाकरे

मुंबई – शिवसेनेला ते गृहित धरुन चालत होते. की शिवसेना फरफटत येणारच. पण शिवसेना कधीही फरफटत जाण्याऱ्या पक्षापैकी आधी नव्हती, उद्याही नसेल आणि कधीच नसणार,” अशा शब्दांत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी विरोधकांना खडसावले. सह्याद्री अतिथीगृह येथे महाविकास आघाडी शासनाच्या वर्षपूर्तीनिमित्त माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ” महाराष्ट्र थांबला नाही, थांबणार नाही ” या पुस्तिकेचा प्रकाशन सोहळा झाला.  यावेळी  ते बोलत होते. सोहळ्यास राष्ट्रवादीचे सर्वोसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात हे उपस्थित होते.

ठाकरे म्हणाले, महाविकास आघाडी सरकारवर सुरुवातीला तीन चाकाचं सरकार म्हणून टीका झाली. हे तीन चाकाचं सरकार टिकणार नाही, असंही बोललं गेलं. पण विरोधकांना हे लक्षात आलं नाही की या सरकारचं चौथं चाक हे जनतेच्या विश्वासाचं आहे, हे सरकार केवळ राजकारण करण्यासाठी एकत्र आलेलं नाही. जनतेच्या विश्वासामुळं आपण हा सरकाररुपी रथ पुढे नेऊ शकलो आहोत. सरकारवर  जर जनतेचा विश्वासच नसता तर आपण पुढे चालूच शकलो नसतो. आपल्याला विरोधकांची गरजही पडली नसती.”आपल्याला एकमेकांशी संघर्ष करण्याचा खूप अनुभव आहे. एकमेकांशी संघर्ष करत आपण इथंपर्यंत आलो. त्यामुळे आपल्याला माहिती आहे की, संघर्ष केल्यानंतर आपण काय गमावतो आणि एकत्र आल्यानंतर आशीर्वाद कसे कमावतो याचा आपण एक वर्ष अनुभव घेत आहोत.

गेल्या वर्षभर कठीण काळ होता आजही आहे त्यातून आपण बाहेर पडलेलो नाही. नैसर्गिक आपत्ती ठीक आहे, ती मोठीचं असते ती आपल्या हातात नसते. पण काही वेळेला नैसर्गिक आपत्तीत देखील राजकारण केलं जातं हे फार क्लेशकारक असतं, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना टोला लगावला.

यावेळी अजित पवार म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राजेश टोपे यांचा करोनावर इतका अभ्यास झाला आहे की करोना त्यांना झालाच नाही आम्हाला सगळ्यांना झाला. मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे खूप चांगली वाटचाल करत आहेत. आपलं सरकार पडणार, तीन महिन्यात कोसळणार, सहा महिन्यात कोसळणार हे विरोधक म्हणत राहिले पण त्यांना हे सरकार पाडण्यात यश आले नाही. आणि येणार नाही असंही अजित पवार यांनी स्पष्ट केला.

COMMENTS