महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट?

महाविकास आघाडी सरकारमध्ये फूट?

मुंबई – राज्यात भाजपला सत्तेपासून रोखण्यासाठी महाविकास विकास आघाडी सरकार अस्तित्वात आहे. मात्र, सरकार स्थापन झाल्यापासून दरवेळी कोणता ना कोणता पक्ष नाराज होत असतो. त्यांच्या नाराजी नाट्य वारंवार रंगत असल्याने हे सरकार आपला कार्यकाळ पूर्ण न करता पडणार, अशी वारंवार चर्चा रंगत असते. काल विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात मुख्यमंत्र्यांनी उध्दव ठाकरे यांनी जोरदार फटकेबाजी केली. यात भाजपला घायाळ करीत असताना महाविकास आघाडीतील घटकपक्ष नाराज झाला असून त्या पक्षाच्या आमदाराने थेट राजीनामा देण्याचा इशारा दिला आहे. तसेच त्याची तक्रार महाविकास आघाडीचे सर्वेसर्वो शरद पवार यांच्याकडे तक्रार केली आहे.

बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत राज्यपालांच्या अभिभाषणावर बोलत असताना बाबरी मशिदीच्या पतनाचा उल्लेख केला. ठाकरे यांनी बाबरी मशिद पडली तेव्हा सर्व येरेगबाळे पळून गेले होते आणि फक्त बाळासाहेब तिकडे ठाम उभे होते असं म्हणत विरोधकांना प्रत्युत्तर दिलं. उद्धव ठाकरेंच्या याच भाषणावर समाजवादी पार्टीचे आमदार अबु आझमी यांनी आक्षेप घेतला असून सरकारमधील सर्व मुस्लीम मंत्र्यांनी आपले राजीनामे द्यावे अशी मागणी केली आहे.

“महाविकास आघाडी सरकार सेक्युलर नाहीये. हे सरकार किमान समान कार्यक्रमाच्या आधारावर बनलं होतं, परंतू मुख्यमंत्र्यांना याचा विसर पडलेला दिसतोय. या सरकारमधील सर्व मुस्लीम मंत्र्यांनी आपले राजीनामे द्यायला हवेत. मुख्यमंत्री सभागृहात मंदीर-मशिदीबद्दल बोलत होते. बाबरी मशिद पतनाच्या अपराधाबद्दल ते बोलत होते, जे योग्य नाही”, अशा शब्दांमध्ये अबु आझमी यांनी आपली नाराजी व्यक्त केली. महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले मंत्री NRC, CAA आणि मुस्लीम आरक्षणाचा मुद्दा विसरले आहेत. त्यांना याची लाज वाटली पाहिजे आणि यासाठी त्यांनी ताबडतोक राजीनामे द्यायला हवेत. या बाबतीत शरद पवारांना पत्र लिहणार असल्याचंही अबु आझमी यांनी स्पष्ट केलं.

COMMENTS