राज्याच्या राजकारणात आणखी एका पक्षाची स्थापना, विधानसभेची निवडणूक लढवणार!

राज्याच्या राजकारणात आणखी एका पक्षाची स्थापना, विधानसभेची निवडणूक लढवणार!

पुणे – राज्याच्या राजकारणात आणखी एका नवीन पक्षाचा उगम झाला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीतून बाहेर पडलेल्या लक्ष्मण मानेंनी या नव्या पक्षाची घोषणा केली आहे. महाराष्ट्र बहुजन वंचित आघाडी असं या नवीन पक्षाचं नाव असून 29 तारखेला पुण्याच्या बालगंधर्व रंगमंदिरात आघाडीचा पहिला निर्धार मेळावा पार पडणार असून माजी न्यायमूर्ती पीबी सावंत यांच्या हस्ते या मेळाव्याचं उद्घाटन होणार असल्याचं माने यांनी म्हटलं आहे. माने यांच्या या घोषणेमुळे भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना मोठा धक्का बसला असल्याचं दिसत आहे.

दरम्यान लोकसभा निवडणुकीतील चूक आता करायची नाही. भाजपचा पराभव करण्याऐवजी त्यांच्याच 12-12 जागा निवडून आल्या. त्यामुळे मला अपराधीपणा वाटत होता. जातीयवादी आणि धार्मिक संघटना बरोबर आम्ही जाणार नाही. भाजप युतीला हरविण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यामुळे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि डाव्या विचारांशी चर्चा करणार आहोत. विधानसभेला डाव्या आघाडी बरोबर जाण्याचा निर्णय घेतल्याचं लक्ष्मण मानेंनी सांगितलं. तसेच मातंग, धनगर, रिपब्लिकन ओबीसी संघटनांबरोबर आमची चर्चा सुरु असल्याचं माने यांनी म्हटलं आहे. पुण्यात पत्रकार परिषद घेऊन त्यांनी ही घोषणा केली आहे.

COMMENTS