सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा – विखे- पाटील

सनातन संस्थेचे प्रमुख जयंत आठवलेंना अटक करा – विखे- पाटील

मुंबई – विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी सनातन संस्थेचे प्रमुख डॉ. जयंत आठवले यांना अटक करून चौकशी करण्याची मागणी केली आहे.   महाराष्ट्र व कर्नाटकातील चारही विचारवंतांच्या हत्येचा मूळ सूत्रधार शोधायचा असेल तर पोलिसांनी आठवले यांना पहिले अटक करावे असं विखे – पाटील यांनी म्हटलं आहे. डॉ. दाभोलकरांसारख्या विचारवंतांची हत्या करणारे सचिन अंदुरे आणि शरद कळसकर आज पोलिसांच्या ताब्यात आहेत. पण मागील काही महिन्यांमध्ये अशा सुमारे 500 तरूणांना शस्त्र प्रशिक्षण देण्यात आले असून, ते अजूनही मोकाट आहेत. त्यामुळे त्यांना शोधून काढायचे असेल तर जयंत आठवले यांना ताब्यात घ्या असं विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान दोन दिवसांपूर्वी हमीद दाभोलकर यांनी डॉ. दाभोलकर यांच्या हत्येमागील मूळ सूत्रधाराचा पर्दाफाश करण्याची मागणी केली होती. आज पुण्यात निघालेल्या मोर्चातून देखील हीच मागणी करण्यात आली आहे. या मागणीला आपला पूर्ण पाठिंबा असल्याचंही विखे –पाटील यांनी म्हटलं आहे. दरम्यान महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात शस्त्रे व बॉम्बसाठा सापडतो, तरूणांना फितवून शस्त्रांस्त्रांचे प्रशिक्षण दिल्याचे दिसून येते, संशयीत मारेकऱ्यांकडे डायरीत पुरोगामी चळवळीतील विचारवंतांची’हिटलिस्ट’ सापडते. देशविघातक कारवायांचे एवढे पुरावे हाती लागल्यानंतरही सरकार गप्पच आहे. प्रारंभी विचारवंतांच्या हत्या करण्यात आल्या. आता सामूहिक हत्यांचा कट रचला जातो आहे. वैभव राऊतकडे सापडलेले 20 बॉम्ब, 21 गावठी पिस्तुले दिवाळी साजरी करायला आणलेले नव्हते. बकरी ईद,गणेशोत्सवासारख्या धार्मिक सणांमध्ये बॉम्ब फोडून त्यांना धार्मिक हिंसाचार घडवायचा होता. मराठा क्रांती मोर्चामध्ये बॉम्ब फोडून राज्यातील सामाजिक सलोखा धोक्यात आणायचा होता.  या साऱ्या बाबी देशाविरूद्ध छुपे युद्ध पुकारल्यासारखे असून, यापश्चातही सरकार संबंधित संघटनांवर बंदी घालण्याचा निर्णय का घेत नाही? असा सवालही विखे पाटील यांनी केला आहे.

 

COMMENTS