भाजपच्या १२ नगरसेवकांच्या हातावर घड्याळ

भाजपच्या १२ नगरसेवकांच्या हातावर घड्याळ

पुणे : पुणे महापालिकेतील भाजपचे १९ नगरसेवक नाराज असल्याच्या चर्चा आहेत. नाराज नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्याही बातम्या राजकीय वर्तुळात फिरत आहेत. यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचक विधान करून चर्चेला दुजोरा दिला आहे.

गेल्या दोन आठवड्यापासून पुण्यातील भाजपमधील गटबाजीला कंटाळून १९ नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याच्या चर्चांनी जोर धरला आहे. पुणे महापालिका निवडणूक तोंडावर असल्याने पुण्यातील राजकीय वातावरण देखील तापलं आहे. आज अजित पवार संत तुकाराम महाराज आणि ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग संदर्भात बैठकीसाठी पुण्यात आले असता प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांना विचारले असता अजितदादांनी जोरदार फटकेबाजी केली.

अजित पवार म्हणाले, “मागील काळात नरेंद्र मोदी यांचा झंझावात पाहायला मिळाला. देशात भाजपची सत्ता आली. अनेक राज्यांत मोदींमुळे भाजप सत्तेत आलं. परंतु आता महाराष्ट्रात वातावरण बदललेलं आहे. महाविकास आघाडीचं सरकार आल्याने राज्यातली राजकीय समीकरणे बदलली आहेत. जर कुणी आपल्या प्रभागाचा आणि वॉर्डाचा विकास व्हावा म्हणून जर त्यावेळी गेले असतील आणि आता जर वेगळा विचार करुन परत येण्याचा निर्णय घेत असतील तर त्यांचा स्वार्थ नाही कारण फक्त ‘विकास’…”, अशी जोरदार राजकीय फटकेबाजी अजित पवार यांनी केली.

“वार बदललं की काही जण बदलत असतात. राजकारणात काम करताना वेगवेगळे टप्पे येत असतात. अनेक जण अनेक वेळा वेगळे निर्णय घेत असतात… मागे आमच्या पक्षामधल्याच काही जणांनी भाजपमध्ये उड्या मारल्या. उड्या मारणाऱ्या नेत्यांना पक्षनिष्ठा वगैरे काहीही नसतं”, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

COMMENTS