बंडखोरी केल्यामुळे भाजपकडून ‘या’ चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, सोईनुसार निलंबन केल्याची चर्चा!

बंडखोरी केल्यामुळे भाजपकडून ‘या’ चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी, सोईनुसार निलंबन केल्याची चर्चा!

मुंबई – विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बंडखोरी केल्यामुळे भाजपमधील चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. तुमसर येथील चरण वाघमारे, मीरा भाईंदरमधील गीता जैन, पिंपरी चिंचवडमधील  बाळासाहेब ओव्हाळ, तर अहमदपूरमधील दिलीप देशमुख यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षशिस्तीचा भंग केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली असून
या चारही नेत्यांची हकालपट्टी करण्याचा आदेश भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी दिला आहे. पक्षाच्या उमेदवारांविरोधात बंडखोर उमेदवारांनी आपला अर्ज मागे घ्यावा अन्यथा त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला होता. त्यानंतर या चार नेत्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान भंडारा जिल्ह्यातील तुमसर मतदारसंघातील भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना तिकिट देण्याऐवजी भाजपने प्रदीप पडोळे यांना उमेदवारी दिल्याने चरण वाघमारे यांनी बंडखोरी केली आहे. त्यांनी अपक्ष म्हणून या ठिकाणी उमेदवारी दाखल केली आहे. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

तर भाजप सेना महायुतीच्या उमेदवाराविरोधात पिंपरी विधानसभा मतदार संघात बंडखोरी करणाऱ्या आणि भाजप चिन्हावर पिंपरी चिंचवड महापालिकेत निवडून आलेल्या बाळासाहेब ओव्हाळ यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.

दरम्यान भाजपाने हे सोईनुसार निंलबन केलं केले असल्याची चर्चा राजकीय वर्तुळा सुरु आहे. कारण कल्याण पश्चिमचे बंडखोर उमेदवार ( आमदार ) नरेंद्र पवार यांच्यावर पक्षाकडून कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच उरणमध्ये देखील महेश बालदी यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे याच नेत्यांचं निलंबन का करण्यात आलं अशी चर्चा आता सुरु आहे.

COMMENTS