…तर पवारांची औलाद सांगणार नाही,   अजित पवारांचं खुलं आव्हान !

…तर पवारांची औलाद सांगणार नाही, अजित पवारांचं खुलं आव्हान !

बीड – राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी खुलं आव्हान केलं आहे. बीडमधील परळीत राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेदरम्यान त्यांनी आमचं सरकार सत्तेवर आलं, की सहा महिन्यात शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगायचो नाही’ असं खुलं आव्हान केलं आहे. ‘तुम्ही म्हणाल अजित पवार, तुम्ही एवढं कडक सांगताय, काय तुम्ही करणार? आमचं सरकार सत्तेवर आलं, तर आम्ही त्यांच्यासारखी कर्जमाफी तुम्हाला करणार नाही. मी आपल्या सर्वांना सांगतो, माझ्या सगळ्या सहकाऱ्यांच्या साक्षीने सांगतो. परळीकरांनो, मी दिलेला शब्द पाळणारा कार्यकर्ता आहे. पहिल्या चार ते सहा महिन्यांमध्ये तुम्हा शेतकऱ्यांचा सातबारा कोरा केला नाही, तर पवारांची औलाद सांगणार नाही असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

दरम्यान यावेळी त्यांनी भाजप सरकारवरही जोरदार टीका केली आहे. आम्ही पहिल्यांदा करुन दाखवलंय, या लोकांची करुन दाखवण्याची दानत नाही. यांच्या काळात 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. माझ्या 16 हजार आया-बहिणी विधवा झाल्या. देवेंद्र फडणवीस साहेब, कोणावर 302 चा गुन्हा दाखल करायचा सांगा. काय केलं होतं त्या शेतकऱ्यांनी? का ही परिस्थिती निर्माण झाली?’ असा सवालही अजित पवार यांनी यावेळी केला आहे.

COMMENTS