औरंगाबाद नामांतराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

औरंगाबाद नामांतराबाबत राज्य सरकारचा मोठा निर्णय

मुंबई – सध्या राज्यात औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करण्याचा मुद्द्यावर विविध पक्षांमध्ये मतभेद आहे. शिवसेना, भाजप आणि मनसे नामांतरासाठी आग्रही आहे. तर काॅंग्रेस, बहुजन विकास आघाडी, रिपाई या पक्षांनी विरोध केल्याने महाराष्ट्राचे राजकारण दिवसेंदिवस तापत असताना, आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे.

औरंगाबाद विमानतळाचे छत्रपती संभाजी महाराज विमानतळ असे नामकरण करण्याबाबत केंद्रीय नागरी उड्डयन मंत्रालयाने अधिसूचना लवकरात लवकरात काढावी, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्र्यांना कळवले आहे. याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांनी केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री हरदिप पुरी यांना स्मरण पत्र पाठवले आहे.

या पत्रात म्हटले आहे की, औरंगाबादच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज यांचे नाव देण्याबाबत राज्याच्या मंत्रिमंडळाने निर्णय घेतला आहे. याबाबतचा ठराव विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आला आहे.

दरम्यान, काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेला सुचक इशारा दिला असून सामाजिक सलोखा राखण्यासाठी आमचा कोणत्याही शहराचे नामांतर करण्यास ठाम विरोध आहे, असे सांगितले आहे.

COMMENTS