विधान परिषदेच्या जागांवरून महाविकास आघाडीत नवा वाद, काँग्रेसनं केली ‘ही’ मागणी!

विधान परिषदेच्या जागांवरून महाविकास आघाडीत नवा वाद, काँग्रेसनं केली ‘ही’ मागणी!

मुंबई – महाविकास आघाडीत नव्या वादाला तोंड फुटले आहे.विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवरुन काँग्रेसमध्ये नाराजी आहे. विधान परिषदेत जागा वाटपात शिवसेनेला 5 जागा, राष्ट्रवादी 4 तर काँग्रेसला 3 जागा देण्याचा प्रस्ताव देण्यात आला आहे. परंतु काँग्रेस नेत्यांनी 12 जागा आणि महामंडळाच्या नेमणुकीसाठी नवी मागणी केली आहे. त्यामुळे लवकरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करणार असून यातून मधला मार्ग काढणार असल्याची माहिती आहे.

दरम्यान महाविकास आघाडीत यापूर्वी आमदारांच्या संख्येवरून मंत्रिपदाचे वाटप झाले होते. पण, इतर बाबीत सर्व वाटप हे समसमान होईल, असं महाविकास आघाडीत ठरलं होतं. एवढंच नाहीतर विधान परिषदेच्या जागा ही तिन्ही पक्षांनी समान वाटून घ्याव्यात, असा निर्णय शरद पवार यांच्या उपस्थितीत झाला होता. त्यामुळे काँग्रेसच्या नेत्यांनी विधान परिषदेच्या जागा वाटपात समसमान व्हावे, अशी इच्छा बोलून दाखवली आहे.

11 जून रोजी (गुरुवार) काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांची मुंबईत बैठक पार पडली. या बैठकीला प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, मुंबईचे पालक मंत्री असलम शेख, ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्यासह विधानसभा अध्यक्ष नाना पटोले आणि इतर नेते हजर होते. यावेळी या नेत्यांनी 12 जागा आणि महामंडळाच्या नेमणुकीसाठी नवी मागणी केली आहे.

COMMENTS