बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडे

बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस व गारपिटीने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करा – धनंजय मुंडे

परळी तालुक्यात वीज पडून मृत्यू झालेल्या शेतकऱ्याच्या कुटुंबियास मदत करण्याच्याही दिल्या सूचना

बीड – बीड जिल्ह्यात दि. १६ व १७ मार्च रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने प्रभावित झालेल्या शेती पिकांचे तात्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. तसेच परळी तालुक्यातील मांडेखेल येथील शेतकरी सुधाकर नागरगोजे (वय ३८) यांचा वीज पडून मृत्यू झाला आहे. सोबतच एक तरुणासह ४ महिला जखमी झाल्या आहेत. त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळवुन देण्याबाबतही आवश्यक कारवाई तात्काळ करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला मुंडेंनी दिल्या आहेत.

जिल्ह्यात पुन्हा एकदा अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यावर संकट आणले असून जिल्ह्यातील अनेक भागात याचा फटका विविध पिकांना बसला आहे. काही ठिकाणी वीज पडून जनावरे दगावल्याच्याही घटना घडल्या आहेत.

दरम्यान परळी तालुक्यातील शेतकरी सुधाकर नागरगोजे हे शेतात काम करत असताना वीज पडून त्यांचा मृत्यू झाला आहे तर १६ वर्षीय नागनाथ नागरगोजे जखमी झाला आहे. नागनाथवर परळी येथील माऊली हॉस्पिटल येथे उपचार सुरू असून आणखी ४ महिला किरकोळ जखमी झाल्या आहेत. मयत व जखमी यांच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत मिळवुन देण्याबाबतही मुंडेंनी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.

गारपिटी दरम्यान वीज पडून दगावलेल्या जनावरांच्या मालकांनाही नुकसानभरपाई देन्यासाठी तात्काळ पंचनामे करावेत व त्याचा अहवाल सादर करावा अशा सूचना पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत.

COMMENTS