थोडेफार राहिलेले पक्ष काही दिवसात शिवसेना-भाजपात विलीन होतील, संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य!

थोडेफार राहिलेले पक्ष काही दिवसात शिवसेना-भाजपात विलीन होतील, संजय राऊतांचं खळबळजनक वक्तव्य!

नाशिक – शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी खळबळजनक विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीनंतर विरोधक आहे का हे मी शोधतोय. चार वर्षे विरोधकांची भूमिका शिवसेनेनं घेतली, तेव्हा विरोधक कुठे झोपले होते का? विरोधकांचे पक्ष आहे तरी कुठे हे मी शोधतोय, काही पक्षांना देशात आणि राज्यात अध्यक्ष मिळत नाही, त्यांनी जाहिरात दिलीय अध्यक्ष पाहिजेत म्हणून, त्यामुळे काही थोडेफार राहिलेले पक्ष दिसताय ते येत्या दहा ते पंधरा दिवसात शिवसेना भाजपात विलीन होतील असं वक्तव्य राऊत यांनी केलं आहे. ते नाशिक येथे बोलत होते.

दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर शिवसेना नेहमी आवाज उठवते, सत्तेत असो वा नसो. पीकविमाबाबत ज्या त्रुटी असतील त्या दूर व्हाव्यात आणि शेतकऱ्यांना न्याय मिळावा यासाठी शिवसेनेनं भूमिका घेतली, सत्तेत असूनही पीकविमा कंपन्यांच्या विरोधात गेलो. राजू शेट्टी यांनी स्वतः आंदोलनात सहभागी व्हावे नाहीतर स्वतः आंदोलन करावे. राजू शेट्टीना लोकसभेत जनतेनं त्यांना घरी पाठवलं आहे हे त्यांनी विसरू नये अशी टीकाही राऊत यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील काही आमदार यापूर्वी कर्नाटकमध्ये राहिले आहेत. कर्नाटकमधील आमदार मुंबईत आले असतील तर ते मुंबईत आहेत पाकिस्तानमध्ये नाही. त्यामुळे त्यांना महाराष्ट्राची संस्कृती समजून घेता येईल. आमचा महाराष्ट्राच्या बेळगावचा सीमा प्रश्न आहे, अनेक देवळात जाताय, देव त्यांना सद्बुद्धी देईल आणि सीमा भागातील जो सातत्याने अत्याचार सुरू आहे त्यासंदर्भात एक चांगला निर्णय घेतील अशी आम्ही प्रार्थना करतो असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

तसेच आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाने काय केलं, अनेक सरकार ही काँग्रेस पक्षाने पाडलीय, राजकारणात ह्या गोष्टी अपरिहार्य आहेत. काँग्रेस पक्षातील आमदार का फुटतायत, कर्नाटकमधील सरकार का अस्थिर आहे, याचं आत्मचिंतन राहुल गांधी यांनी करायला हवं, स्वतः राहुल गांधी यांनी पलायन केले आहे. नेतृत्वापासून त्यामुळे त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. असही यावेळी राऊत यांनी म्हटलं आहे.

कोपर्डी घटनेला ३ वर्ष झाली, मुख्यमंत्री यांनी आश्वासन दिले होते. कोपरडीची घटना अत्यंत घृणास्पद होती. संपूर्ण देशाला हादरे देणारी घटना होती. सर्वच राजकीय पक्षांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे राहावे लागले होते.
आता अश्वासनांवर पीडित मुलींच्या आईवडिलांनी काही प्रश्न उपस्थित केले असतील तर सरकारने उत्तर द्यावे लागेल असही राऊत यांनी म्हटलं आहे.

वंचित बहुजन आघाडीची डोकेदुखी होणार नाही

वंचित बहुजन आघाडीची काहीही डोकेदुखी होणार नाही. युती झाली नव्हती तेव्हा आम्ही म्हणत होतो की आम्ही 288 जागा लढवू, जर आंबेडकर म्हणत असतील तर त्यांचं स्वागत करायला पाहिजे असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

महेंद्र सिंग धोनी भाजपमध्ये जाणार का ?

मला कोणीतरी म्हटले ते शिवसेनेत येणार आहे. माझ्याकडे अशी माहिती आहे की त्यांना खरं म्हणजे शिवसेनेत यायचे आहे.महेंद्र सिंग धोनी सेन्सिटिव्ह खेळाडू आहे. संवेदनशील व्यक्तींचं राजकारणात स्वागत केलं पाहिजे. खेळाडू, सैनिक आणि कलावंत यांना शक्यतोवर कुठल्याही वादामध्ये ओढू नये असंही राऊत यांनी म्हटलं आहे.

COMMENTS