एकनाथ खडसेंवरील बेहिशेबी मालमत्ताच्या आरोपांबाबत काय कारवाई केली? – उच्च न्यायालय

एकनाथ खडसेंवरील बेहिशेबी मालमत्ताच्या आरोपांबाबत काय कारवाई केली? – उच्च न्यायालय

मुंबई – भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंवरील बेहिशेबी मालमत्ताच्या आरोपांबाबत काय कारवाई केली असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी माजी महसूलमंत्री एकनाथ खडसे आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात बेहिशेबी मालमत्तेचे आरोप करत मुंबई उच्च न्यायालयात फौजदारी याचिका दाखल केली आहे. शुक्रवारी दमानिया यांच्या याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. खडसेंवरील बेहिशेबी मालमत्तेच्या आरोपांबाबत राज्य सरकारने काय कारवाई केली अशी विचारणा उच्च न्यायालयाने सरकारला केली. उच्च न्यायालयाकडून विचारणा झाल्याने एकनाथ खडसे यांच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.

एकनाथ खडसे पुण्यातील भोसरीमधील जमीन खरेदीप्रकरणी अडचणीत आले होते. खडसेंना जमीन खरेदीच्या या प्रकरणामुळे मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला होता. राज्य सरकारने याप्रकरणाच्या चौकशीसाठी माजी न्यायमूर्ती दिनकर झोटिंग यांची एकसदस्यीय समिती नेमली होती. काही दिवसांपूर्वीच या समितीने राज्य सरकारला अहवाल दिला होता. आपल्या पदाचा खडसेंनी गैरवापर केल्याचे समितीने म्हटले होते. मात्र खडसेंविरोधात फौजदारी कारवाईची शिफारस समितीने केली नव्हती. त्यामुळे खडसेंना मोठा दिलासा मिळाला होता. खडसेंचे मंत्रिमंडळात पुनरागमन होणार अशी चर्चाही पुन्हा सुरु झाली होती. मात्र आता बेहिशेबी मालमत्तेच्या प्रकरणामुळे खडसेंच्या अडचणी पुन्हा वाढल्या आहेत.

 

COMMENTS