धनगर समाजाच्या मोर्चात पोलीस आणि आंदोलकांत बाचाबाची

धनगर समाजाच्या मोर्चात पोलीस आणि आंदोलकांत बाचाबाची

मुंबई – धनगर समाजाच्या वतीने आरक्षणासाठी मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मोर्चाचं आयोजन करण्यात आलं. यशवंत सेनेचे अध्यक्ष पांडुरंग गडदे याच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चा दरम्यान पोलीस आणि आंदोलक यांच्यात बाचाबाची झाली. आमचं सरकार आलं तर पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाला आरक्षण देऊ असं आश्वासन भाजपनं दिलं होतं. मात्र हे आश्वासन भाजपनं पाळलं नाही म्हणूनच त्यांचा निषेध करत मोर्चा काढला आहे अशी माहिती गडदे यांनी दिली.

निवडणुकांपूर्वी भाजपने जो जाहीरनामा जनतेसाठी आणला होता त्यातही धनगर समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते अजूनही पूर्ण न झाल्यानं अखेर धनगर समाजाने आज मोर्चा काढला होता. या मोर्चा दरम्यान धनगर समाजाचे आंदोलक आणि पोलीस यांच्यात वाद झाला. मोर्चाच्या सुरूवातीलाही पोलिसानी परवानगी न दिल्याने आंदोलक आणि मोर्चेकरी यांच्यात वाद झाला होता. कायदा आणि सुव्यस्थेचा प्रश्न येऊ नये म्हणून अखेर पोलिसांनी त्यांना आंदोलन करण्यास परवानगी दिली.

धनगर समाजाला आरक्षण मिळावं म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून आंदोलन सुरू आहे, मात्र हा प्रश्न सुटलेला नाही. तीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणुकांच्या वेळी भाजपनं धनगर समाजाला आरक्षण देण्याचं आश्वासन दिलं होतं. त्यानंतर सत्तेवर आल्यावरही भाजपनं हे आश्वासन पाळलं नाही. भाजपनं आश्वासन न पाळल्यानं धनगर समजाची अधोगती सुरू झाली आहे असा आरोपही गडदे यांनी केला आहे.

COMMENTS