सदाभाऊ खोत यांच्याकडून नव्या शेतकरी संघटनेची घोषणा !

सदाभाऊ खोत यांच्याकडून नव्या शेतकरी संघटनेची घोषणा !

मुंबई – राज्याचे कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आज नवीन शेतकरी संघटना स्थापन करण्याची घोषणा केलीय. स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडचिठ्ठी दिल्यानंतर त्यांनी हा मोठा निर्णय घेतलाय. आज मुंबईत पत्रकार परिषद घेऊन त्यांनी यासंबंधीची घोषणा केली. नव्या संघटनेची पत्रकार परिषद घेताना सदाभाऊ यांच्यासोबत मराठा मोर्चाचे सुरेश पाटील हेही उपस्थित होते.

नव्या शेतकरी संघटनेची ध्येय धोरणं ठरवण्यासाठी पक्षाची एक मसुदा समिती स्थापन केल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. ही मसुदा समिती संघटनेचं नाव, झेंडा, नियमावली ठरवून याबाबतचा अंतिम अहवाल देईल. येत्या 21 सप्टेंबरला कोल्हापूरला संघटनेच्या बैठकीत ही मुसदा समितीची आपला अहवाल सादर करेल. त्याचवेळी संघटनेच्या प्रमुख 21 पदाधिकाऱ्यांच्या नावांची घोषणा केली जाईल. त्यानंतर दसऱ्याच्या मुहूर्तावर म्हणजेच 30 सप्टेंबरला इचलकरंजीत नव्या शेतकरी संघटनेचा पहिला मेळावा घेतला जाईल.

नवी शेतकरी संघटना स्थापन करताना सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींवर विरोधकांसोबत राजकीय साटंलोटं केल्याचे आरोप केलेत. ”कोल्हापूरमध्ये काँग्रेससोबत युती करताना राजू शेट्टींना स्वामिनाथन आयोग का आठवला नाही ?, आता तुम्ही भाजपसोबतची युती तोडलीत तर मग तुम्ही खासदारकीचा राजीनामा देणार का ? शेट्टी तुम्ही किती भूमिका बदलता आणि किती पक्षांना पाठींबा देता? मला स्वाभिमानी संघटनेत राहायचे होते, पण शेट्टींनीच तशी स्थिती ठेवली नाही, त्यांना फक्त माझा राजीनामा घायचा होता, ”अशा एकापाठोपाठ आरोपांच्या फैरीच सदाभाऊंनी आजच्या पत्रकार परिषदेत शेट्टींवर झाडल्या.

”माझं मंत्रिपद डोळ्यात खुपत असल्यानेच त्यांनी चौकशी समितीचं नाटक करून मला स्वाभिमानी संघटनेतून बाहेर काढण्याचा घाट घातला. तसंच माझी आमदारकी आणि मंत्रिपद हे दोन्हीही भाजपच्या कोट्यातली असल्याने राजीनाम्याचा प्रश्नच येत नाही, ” हे सांगायलाही ते विसरले नाहीत.

 

 

COMMENTS