मुंबई, पुणे, नागपूर आणि कोल्हापूर पोटनिवडणुकीत भाजप जिंकले पण….

मुंबई – भांडूप  महापालिका पोटनिवडणुकीत कमळ फुलले !

मुंबई – महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 116 मधील पोटनिवडणुकीत शिवेसनेला धक्का बसला असून भाजपला विजय मिळाला आहे. भाजपच्या उमेदावार जागृती पाटील यांनी तब्बल 4992 मतांनी विजय मिळवला आहे.  भाजपच्या जागृती पाटील यांना 11229 तर शिवसेनेच्या मिनाक्षी पाटील यांना 6337 मते मिळाली. यापूर्वी ही जागा काँग्रेसकडे होती. मात्र काँग्रेसच्या नगरसेविका प्रमिला पाटील यांच्या अकाली निधनाने ही जागा रिक्त झाली होती. त्याच जागेवर भाजपने प्रमिमा पाटील यांच्या सूनेला तिकीट देत विजय खेचून आणला.

……………………………………………………………………………………………………..

पुणे – भाजप आरपीआय आघाडीच्या हिमाली कांबळे विजयी

पुणे – माजी उपहापौर नवनाथ कांबळे यांच्या निधनाने रिक्त झालेल्याने कोरेगाव पार्क – घोरपडीमधील प्रभाग क्रमांक 21 मधील जागेवर भाजप आणि आरपीआय आघाडीच्या उमेदवार आणि नवनाथ कांबळे यांची मुलगी हिमाली कांबळे हिने विजय मिळवलाय. हिमाली कांबळे यांनी सुमारे 4 हजारांपेक्षा जास्त मतांनी विजय मिळवला आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार धनंजय गायकवाड यांचा त्यांनी पराभव केला.

………………………………………………………………………………….

कोल्हापूर – ताराराणी – भाजप आघाडीने जागा राखली

कोल्हापूर – महापालिकेच्या प्रभाग 11 मधील पोटनिवडणुक भाजप- ताराराणी आघाडीचा विजय झालाय. आघाडीचे उमेदवार रत्नेश शिरोळकर हे 200 मतांनी विजयी झाले आहेत. त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीचे राजेश लाटकर यांचा पराभव केला. शिरोळकर यांना 1399  तर लाटकर यांना 1199 मते मिळाली. ही जागा पूर्वी भाजप ताराराणी आघाडीकडेच होती.

…………………………………………………………………………………….

नागपूर – पोटनिवडणुकीत भाजपचा विजय !

नागपूर महानगर पालिकेच्या प्रभाग ३५ (अ) करता झालेल्या पोट निवडणुकीत भाजपने जागा राखली आहे. पक्षाच्या संदीप गवई यांनी काँग्रेसच्या पंकज थोरात यांचा ४६३ मतांनी पराभव करत हा विजय मिळवला आहे. संदीप गवई यांना ५,७११ तर थोरात यांना ५,२४८ मते मिळाली. या पोट निवडणुकी करता काल मतदान झाले होते आणि केवळ २४.३३ % मतदानाची नोंदणी झाली होती. मतदान अत्यल्प झाल्याने निकाल कुणाच्या बाजूने लागतो याबद्दल राजकीय पंडितांमध्ये संभ्रम होता. या निवडणुकीत ७  उमेदवार रिंगणात असले तरीही मुख्य लढत सत्ताधारी भाजप व कॉंग्रेस मध्येच होती. राष्ट्रवादीने कॉंग्रेस उमेदवाराला समर्थन दिले होते तर शिवसेनेने उमेदवार उभा केला नव्हता. भाजपची सत्ता असलेल्या नागपूर महानगर पालिकेत या वर्षी फेब्रुवारी मध्ये झालेल्या निवडणुकीत १५१ पैकी पक्षाचे तब्बल १०८ नगरसेवक निवडून आले. महापालिकेत सत्ता स्थापनेच्या दोन महिन्यातच प्रभाग ३५ (अ) मधील भाजप नगरसेवक निलेश कुंभारे यांच्या निधनामुळे हि निवडणूक झाली. फेब्रुवारी मध्ये झालेल्या निवडणुकीत पंकज थोरात हे सुमारे ३,५०० मतांनी पराभूत झाले होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विधान सभा मतदार संघाचा भाग असलेल्या या प्रभागाचा निकाल काय लागतो याची भाजप नेत्यांना देखील प्रतीक्षा होती. या प्रभागात फडणवीस यांनी सुरु केलेले प्रकल्प आपण पुढे राबवणार असल्याचे भाजपचे विजयी उमेदवार संदीप गवई म्हणाले.

चारपैकी मुंबईमधील भांडूपची जागा काँग्रेसकडे होती. ती भाजपने काँग्रेसकडून हिराऊन घेतली. मात्र इथेही भाजपला स्वतःचा उमेदवार मिळाला नाही. काँग्रेसच्या दिवंगत नगरसेविका प्रमिला पाटील यांचा मुलगा आणि सुनेला पक्षात घेऊन सून जागृती पाटील यांना तिकीट दिले आणि सहानुभूतीच्या जोरावर तिथली जागा जिंकली. पुण्यातही तीच स्थिती होती. माजी उपमहापौर नवनाथ कांबळे यांच्या अकाली निधनाने तिथे निवडणूक लागली आणि नवनाथ कांबले यांची मुलगी तिथे निवडणू आली. नागपुरातही भाजपच्या नगरसेवकाचे अकाली निधन झाले होते त्यामुळे तिथेही सहानभुतीचा फायदा भाजपला झाला मात्र भाजपचे मताधिक्य 3500 हून केवळ 500 मतांवर घसरलं. तर कोल्हापुरात भाजपनं जागा राखली तीही केवळ 200 मतांनी. त्यामळे या चारही जागांवर भाजपचा विजय झाला असला पक्षाने खूप मोठा विजय मिळवला असं म्हणता येणार नाही.

COMMENTS