सरकारने तूर खरेदी केंद्र बंद करून शेतक-यांचा विश्वासघात केलाः खा. अशोक चव्हाण

सरकारने तूर खरेदी केंद्र बंद करून शेतक-यांचा विश्वासघात केलाः खा. अशोक चव्हाण

तूर खरेदी केंद्रे तात्काळ सुरु झाली नाहीत; तर काँग्रेस पक्ष तीव्र आंदोलन करणार

 

सरकारने नाफेडमार्फत सुरु असलेली तूर खरेदी केंद्र अचानक बंद करून राज्यातील शेतक-यांचा विश्वासघात केला असून तूर खरेदी केंद्र तात्काळ सुरु केली नाहीत तर काँग्रेस पक्ष राज्यभरात तीव्र आंदोलन करेल असा इशारा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खासदार अशोक चव्हाण यांनी दिला आहे.

टिळक भवन येथे पत्रकारांशी बोलताना खा. चव्हाण यांनी तूर खरेदी केंद्र बंद करण्याच्या सरकारच्या निर्णयावर जोरदार टीका केली. ते म्हणाले की, गेल्या एक महिन्यापासून शेतकरी काम सोडून तूर खरेदी केंद्राच्या बाहेर उभे आहेत.  बारदाना नसल्याने महिनाभर केंद्राबाहेर राहूनही बहुतांशी शेतक-यांची तूर खरेदीअभावी पडून आहे. खासगी व्यापा-यांनी तूरीचे भाव पाडल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. राज्यात कोणत्याही शेतीमालाला हमीभाव मिळाला नाही. या सरकारच्या हमीलाही किंमत राहिली नसून सरकारचा शेतक-यांबाबत भावही कायम दुजा राहिला आहे. त्यातच सरकारने अचानक तूर खरेदी केंद्र बंद केली आहेत. सरकारच्या या तुघलकी निर्णयामुळे या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का ? असे विचारण्याची वेळ आली आहे. अनेक ठिकाणी तूर खरेदी केंद्राबाहेर पाच-पाच किलोमीटर रांगा आहेत. व्यापा-यांनी भाव पाडले आहेत. शेतकरी हैराण आहे. पण सरकारला याचे काही देणे घेणे नाही. यवतमाळ मध्ये तूर खरेदी केंद्र सुरु करण्याची मागणी करणा-या शेतक-यांवर लाठीचार्ज केला अशी माहिती मिळतेय. राज्य सरकार आता शेतक-यांवर पोलिसी बळाचा वापर करू लागले  आहे, हे अतिशय निंदणीय असून मी याचा निषेध करतो असे चव्हाण म्हणाले.

गेल्यावर्षी तूर डाळीचे दर गगनाला भिडले होते तेव्हा सरकार तूर उत्पादनासाठी शेतक-यांना प्रोत्साहन देईल असे सरकारने जाहीर केले होते. सरकारच्या आश्वासनावर विश्वास ठेवून राज्यभरातील बहुतांशी शेतक-यांनी मोठ्या प्रमाणात तुरीची लागवड केली. यंदा  पाऊस चांगला झाल्याने उत्पादनही भरपूर झाले. सरकारने तुरीला हमीभाव जाहीर करून खरेदीही सुरु केली मात्र बारदाना आणि गोडाऊन उपलब्ध  नाही असे कारण देऊन बहुतांशी शेतक-यांची तूर खरेदी केली नाही. मुख्यमंत्र्यांनीही शेतक-यांचा तुरीचा शेवटचा दाणा खरेदी होईपर्यंत तूर खरेदी केंद्र सुरु राहतील असे सांगितले होते पण मख्यमंत्र्यांनीही आपला तो शब्दही पाळला नाही. ही राज्यातील शेतक-यांची फसवणूक आहे.

सरकारने तात्काळ तूर खरेदी केंद्र सुरु केली नाहीत अगोदरच अडचणीत असलेल्या शेतक-यांवर आत्महत्या करण्याची वेळ येईल अशी भीती आता शेतकरी व्यक्त करू लागले आहेत. सरकारने तात्काळ तूर खरेदी सुरु केली नाही तर काँग्रेस पक्ष राज्यभरात सरकार विरोधात तीव्र आंदोलन करेल असा इशारा खा. चव्हाण यांनी सरकारला दिला.

COMMENTS