आम्ही तुमच्याकडे भीक मागतोय का ? -अजित पवार

आम्ही तुमच्याकडे भीक मागतोय का ? -अजित पवार

कोल्हापूर – आम्ही तुमच्याकडे भीक मागतोय का… अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना मदत करायला सरकारला काय झालंय असा संतप्त सवाल विधीमंडळ पक्षनेते अजितदादा पवार यांनी मुदाळच्या जाहीर सभेत सरकारला केला. आपल्या हक्काचा…शेतकऱ्यांची नाडी ओळखणारा… शेतकर्‍यांचा प्रतिनिधी नसला की काय अवस्था होते हे आज आपण अनुभवतोय. या सरकारला जनतेशी काही देणं घेणं नाही. हे शेतकरी विरोधी सरकार असल्याचा आरोप अजितदादा पवार यांनी केला. तसचे तुमचं माझं आघाडीचं सरकार आणा,  तुमचे प्रश्न सुटल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास अजितदादा पवार यांनी व्यक्त केला. लाखांचा पोशिंदा सुखी नाही, आया बहिणी सुरक्षित नाहीत, कुपोषणाने डोके वर काढले आहे, अनेक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत हे असलं दळभद्री सरकार असून याला उलथवून टाका असे आवाहन अजितदादा पवार यांनी यावेळी केले.

राज्यात वाढलेल्या गुन्हेगारीबाबतचा मुद्दा अजितदादा पवार यांनी पुन्हा एकदा उपस्थित केला आणि अश्विनी बिंद्रे या महिला पोलीस अधिकाऱ्याची वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यानेच हत्या केली ही घटना जनतेसमोर मांडली. डान्सबार बंदी उठवून हे सरकार संसार उध्वस्त करु पहात आहे याचा जाब विचारण्यासाठीच ही परिवर्तन यात्रा असल्याचे अजितदादा पवार यांनी सांगितले.

साडेचार वर्षांत साडेचार लाख कोटीचे कर्ज या राज्यावर केले आहे आणि विधानसभा निवडणुकीपर्यंत पाच लाख कोटीपर्यंत जाईल. एवढा कर्जाचा डोंगर या भाजपवाल्यांनी उभा केला आहे. या सरकारने शेतकऱ्यांची दयनीय अवस्था केली आहे. हे सरकार फक्त उद्योगपतींचे आहे असा आरोपही अजितदादा पवार यांनी केला.विधानसभेत जे केले ते पुन्हा करु नका पक्ष देईल तो उमेदवार निवडून द्या. कर्जबाजारीपणातून बाहेर काढायचे असेल तर बदल हा केलाच पाहिजे असे आवाहन अजितदादा पवार यांनी केले.

इतके दिवस लोकांना जातीजातीमध्ये वाटले आणि आता देवांची जात शोधण्याचा प्रयत्न भाजपवाले करत आहेत. अरे काय चाललंय या राज्यात असा संतप्त सवालही अजितदादा पवार यांनी केला. शरद पवारसाहेब आपले नेते आहेत. दिल्लीच्या राजकारणात एक एक खासदार पवारसाहेबांना साथ देण्यासाठी निवडून दिला पाहिजे. समविचारी पक्षांच्या मतांची विभागणी होवू नये यासाठी आमचा प्रयत्न सुरु आहे. एकदा उमेदवार दिला की त्याचे काम इमानेइतबारे केले पाहिजे. राज्यावर फार मोठा अन्याय होत आहे हे लक्षात घ्या असेही अजितदादा पवार यांनी सांगितले.

संपुर्ण राज्यात ऊस टिकला त्या उत्पादकांनाही पुर्णपणे एफआरपी सरकार देत नाही. देतो ना… चाललंय ना… हेच उत्तर मुख्यमंत्री देत आहेत. अरे काय चाललंय या सरकारचं असा सवालही अजितदादा पवार यांनी केला.या वयात पायाला भिंगरी लावल्यासारखे शरद पवार साहेब फिरत आहेत. त्यांच्या या कामाकडे लक्ष द्या असे सांगतानाच कोणासाठी साहेब हे करत आहेत हे लक्षात घेऊन आपल्या विचाराचे सरकार आणा असे आवाहनही अजितदादा पवार यांनी केले.

नोकरी करण्यासाठी इच्छुक असलेल्या तरुणांचे वय निघुन जात आहे परंतु या तरुणांना हे सरकार नोकर्‍या देत नाही अशी अवस्था या सरकारने केली असल्याने याचा विचार करा असे आवाहनही यावेळी अजित  पवार यांनी जनतेला केले आहे.

COMMENTS