लोकमान्य टिळकांचाच नाही तर देशातील सर्व स्वातंत्र्यवीरांचा ‘हा’ अवमान आहे – अशोक चव्हाण

लोकमान्य टिळकांचाच नाही तर देशातील सर्व स्वातंत्र्यवीरांचा ‘हा’ अवमान आहे – अशोक चव्हाण

मुंबई – थोर स्वातंत्र्यसेनानी लोकमान्य टिळक यांना दहशतवादाचे जनक ठरवणा-या राजस्थान सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा संतप्त सवाल करून लोकमान्य टिळकांचा अवमान केल्याबद्दल भारतीय जनता पक्षाने देशाच्या जनतेची माफी मागावी अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे.

लोकमान्य टिळकांनी देशात स्वातंत्र्याची ज्योत पेटवली. ब्रिटिश सत्तेविरुद्ध सर्वसामान्यांचा आवाज बुलंद करणा-या लोकमान्य टिळकांना दहशतवादाचे जनक ठरविणा-या राजस्थानातील भाजप सरकारचा तीव्र निषेध करून खा. चव्हाण म्हणाले की,  इतिहासाची विटंबना करून थोर नेत्यांच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवणे आणि शिक्षण क्षेत्रात ढवळाढवळ करून स्वहितासाठी इतिहासाचे विकृतीकरण करणे असे घृणास्पद प्रकार भाजपच्या केंद्र व विविध राज्य सरकारांकडून सुरु आहेत. देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान देणा-या महात्मा गांधी,लोकमान्य टिळक, पंडित नेहरू,इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याबद्दल नवीन पिढीमध्ये असणारा आदर कमी व्हावा यासाठीचा हा अश्लाघ्य प्रयत्न आहे. यांची नावे पुसून त्यांच्या जागी स्वातंत्र्य लढ्यात काडीचा सहभाग नसणा-या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या लोकांना महापुरुष बनवण्याचा उद्योग भाजप सरकारकडून केला जात आहे. परंतु गांधी, टिळक, फुले,आंबेडकर ही केवळ नावे नसून त्यांचे थोर विचार, देश व समाजाकरिता केलेला प्रचंड मोठा त्याग व महान कर्तृत्व त्याबरोबर जोडलेले आहे. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा  ठसा त्यांनी घालून दिलेले आदर्श व त्यांच्या विचारांचा सुगंध  कालातीत असून आताच्याच नव्हे तर येणा-या शेकडो पिढ्यांच्या ह्रदयातून ही नावे पुसणे अशक्य आहे. शालेय पाठ्पुस्तकातून महापुरुषांची बदनामी करून भाजप नेत्यांना विकृत आनंद मिळेल परंतु ही नावे जनतेच्या ह्रदयातून कशी काढू शकाल? असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष म्हणाले.

लोकमान्य टिळक हे देशाच्या जनतेकरिता ऐतिहासिक थोर व्यक्तिमत्त्व असून येणा-या अनेक पिढ्यांना ते प्रेरणा देत राहतील. या थोर व्यक्तिमत्त्वाचा जन्म महाराष्ट्राच्या मातीत झाल्याचा सार्थ अभिमान महाराष्ट्राच्या तमाम नागरिकांना आहे. लोकमान्यांचा अवमान करणा-या राजस्थानातील भाजप सरकारच्या कृतीमुळे महाराष्ट्रासह देशभरातील जनतेमध्ये तीव्र संताप आहे. हा फक्त लोकमान्य टिळकांचा नाही तर स्वातंत्र्य लढ्याचा आणि देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी प्राणांचे बलिदान देणा-या स्वातंत्र्यवीरांचा अवमान आहे. या कृत्याबद्दल भारतीय जनता पक्षाने देशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी केली आहे.

COMMENTS