राज्यातील जनतेवर विषप्रयोग करणारे सरकार – खा. अशोक चव्हाण

राज्यातील जनतेवर विषप्रयोग करणारे सरकार – खा. अशोक चव्हाण

औरंगाबाद – धर्मा पाटील  यांनी आत्महत्या करेपर्यंत सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष दिले नाही. विदर्भात कीटकनाशक फवारणी करताना ४४ शेतक-यांचा विषबाधा होऊन मृत्यू झाला. एवढं होऊनही सरकारच्या चौकशी अहवालात कोणीही दोषी नाही. राज्यातील सरकारच शेतक-यांवर विषप्रयोग करून त्यांचा बळी घेत आहे अशी घणाघाती टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी केली आहे. ते औरंगाबाद येथे काँग्रेस पक्षाच्या जिल्हास्तरीय शिबीरात बोलत होते.

काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाने गेल्या 60 वर्षात देश घडवण्याचे काम केले पण भाजप सत्तेत आल्यापासून देश तोडण्याचे काम करीत आहे. भीमा कोरेगाव सारखी प्रकरणे घडवून समाजात विष पेरण्याचे काम सत्ताधारी पक्षाकडून सुरु आहे. राज्यातील आणि देशातील सरकारने खोटी आश्वासने देऊन जनतेची फसवणूक केली आहे. या सरकारने दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. शेतक-यांना कर्जमाफी देण्याऐवजी जाहिरातींवर कोट्यवधींचा खर्च सुरु आहे. बाबा रामदेवच या सरकारच खरे लाभार्थी असून खोटारडे सरकार आणि फसवणूक दमदार अशी परिस्थिती आहे. मराठवाड्यात येणा-या संस्था आणि प्रकल्प मुख्यमंत्र्यांनी इतर ठिकाणी हलवले. मराठवाड्यातल्या रस्त्यांची दुरावस्था झाली आहे. मुख्यमंत्री आणि बांधकाम मंत्र्यांनी हेलिकॉप्टरऐवजी रस्त्याने मराठवाड्यात फिरून दाखवावे. राज्य सरकार मराठवाड्यावर अन्याय करत असून काँग्रेस कार्यकर्त्यांनी लोकांच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरून सरकारविरोधातील संघर्ष तीव्र करावा असे आवाहन काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

COMMENTS