विधीमंडळात मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंवर बोलणं टाळलं, विरोधकांचीही शांत भूमिका !

विधीमंडळात मुख्यमंत्र्यांनी संभाजी भिडेंवर बोलणं टाळलं, विरोधकांचीही शांत भूमिका !

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधीमंडळात कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणावर निवेदन दिलं आहे. यावेळी त्यांनी मिलिंद एकबोटेंवरील कारवाईसंदर्भात माहिती दिली परंतु संभाजी भिडेंवर बोलणं टाळलं असल्याचं दिसून आलं आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेनंतर विरोधकांनीही संभाजी भिडेंबाबत मुख्यमंत्र्यांना प्रश्न विचारला नाही. परंतु यावेळी, मिलिंद एकबोटे यांना अटक का केली नाही, असा प्रश्न मात्र विरोधकांनी मुख्यमंत्र्यांना विचारला. त्यावेळी मिलिंद एकबोटे यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करत फरार झाल्यावर कोंबिंग ऑपरेशन केले. तसेच ज्या न्यायालयात जामिनासाठी एकबोटेंनी अर्ज दाखल केला त्याठिकाणी चांगले वकील नेमत आम्ही विरोध केला असून उलट आम्ही कोठडी मागून चौकशीची मागणी केली असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी सरकार 9 कोटी 45 लाखांची नुकसान भरपाई दोणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली. भीमा कोरेगाव घटनाप्रकरणी सरकार व्यक्ती, जाती,धर्म निरपेक्ष भूमिकेतूनच कारवाई करत असून हे सरकार आपला राजधर्म पाळत असल्याचं ते म्हणाले आहेत. तसेच या प्रकरणात एकूण ५८ गुन्हे दाखल झाले असून १६२ जण अटकेत आहे. तसेच जखमी पोलिस, आधिकारी एकाचा मृत्यू झाला असून यामध्ये जवळपास ९ कोटी ४५ लाखांचं नुकसान झालं आहे. याची भरपाई राज्य सरकारने देण्याचा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले आहेत.

तसेच महाराष्ट्र बंद प्रकरणातील गुन्हे मागे घेतले जाणर असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. यामध्ये गंभीर गुन्हे मागे घेण्यासाठीची प्रक्रिया करण्यासाठी अतिरिक्त महासंचालकांची समिती नेमण्यात येणार असून ही समिती तीन महिन्यात अहवाल देणार आहे. परंतु गुन्हेगारी पार्श्वभूमीवाल्या लोकांचे गुन्हे मागे घेतले जाणार नसल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

COMMENTS