तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना 15 दिवसात करणार – दिलीप कांबळे

तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना 15 दिवसात करणार – दिलीप कांबळे

मुंबई  –  तृतीयपंथी समाजाच्या कल्याणासाठी तसेच त्यांना समाजाच्या विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी तृतीयपंथी कल्याण मंडळाची स्थापना येत्या 15 दिवसात करण्यात येणार असल्याची माहिती सामाजिक न्याय राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी दिली आहे.. तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी मंडळ स्थापन करण्याबाबत मंत्रालयात आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस सामाजिक न्याय विभागाचे सहसचिव ला. र. गुजर, उपसचिव दि.वा.करपे, अवर सचिव सि. अ. झाल्टे, कक्ष अधिकारी कृ. त्रि. कदम, तृतीयपंथियांचे प्रतिनिधी लक्ष्मी नारायण त्रिपाठी, पवित्रा निंभोरकर आदी उपस्थित होते.

त्यावेळी बोलत असताना राज्यमंत्री कांबळे म्हणाले, येत्या 15 दिवसात तृतीयपंथी यांच्या कल्याणासाठी मंडळाची रचना पूर्ण करण्यात येईल. सुरुवातीला या मंडळासाठी 5 कोटीची तरतूद करण्यात येणार असून या मंडळासाठी केंद्र शासनाकडूनही निधी उपलब्ध होणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे. भविष्यात तृतीय पंथीयांच्या सर्व प्रकारच्या कल्याणकारी योजना या मंडळामार्फत राबविण्यात येणार असून या मंडळामुळे तृतीयपंथी यांच्या हक्काचे संरक्षण होऊन त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणता येईल असंही ते म्हणाले आहेत. या मंडळाच्या घोषणेमुळे या समाजाला नवी दिशा मिळणार असून या घटकाच्या शिक्षण, रोजगार, निवासाचे, आरोग्याचे प्रश्न सोडविण्यास मदत होऊन व या समाजाच्या संविधानिक व मानवी हक्काचे संरक्षण होणार असल्याचं लक्ष्मी त्रिपाठी यांनी यावेळी म्हटलं आहे.

 

COMMENTS