…तर आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपचा पराभव होईल – फडणवीस

…तर आगामी निवडणुकीत शिवसेना-भाजपचा पराभव होईल – फडणवीस

मुंबई – लोकसभा आणि विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये जोरदार तयारी सुरु आहे. आगामी निवडणुकीत भाजपला जिंकूच द्यायचं नाही असा ठराव विरोधी पक्षांनी केला आहे. अशातच शिवसेनेनंही आगामी निवडणुकीत एकला चलोचा नारा दिला आहे. परंतु शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यास निवडणुकीत दोन्ही पक्षांचा पराभव होईल. असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. तसेच शिवसेना हा आमचा जुना मित्रपक्ष असून दोन्ही पक्षांची विचारधारा समानच असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. ‘हिंदूस्तान टाइम्स’ या इंग्रजी वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.

दरम्यान काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी झाली आणि भाजपा – शिवसेनेने स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतला तर मतांचे विभाजन होईल. याचा फायदा आघाडीला होईल आणि शेवटी भाजपा – शिवसेना या दोन्ही पक्षांचा पराभव होईल. त्यामुळे युतीतच दोन्ही पक्षांचा फायदा होऊ शकतो असंही मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तसेच आम्ही स्वबळावर लढण्यास तयार आहोत. आमचा दोन- तीन जागेवर पराभव होईल. पण राष्ट्रीय स्तरावर युती अभेद्य ठेवण्याची गरज असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

शिवसेनेला युतीसाठी कसं तयार करणार

राजकीय स्थितीच लोकांना युतीसाठी तयार करते. उत्तर प्रदेशमध्ये समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष हे कट्टर विरोधक एकत्र येतील असे कधी कोणाला वाटले होते का?. महाराष्ट्रात आघाडीचे सरकार असताना राष्ट्रवादीने काँग्रेसशी फारकत घेतली होती. पण वर्षभरातच दोन्ही पक्ष पुन्हा एकत्र आले. त्यामुळे युतीबाबतही हे शक्य असल्याचं मुख्यमंत्र्यांनी या मुलाखतीत म्हटलं आहे.

 भाजपा – राष्ट्रवादी एकत्र येणे अशक्य

राष्ट्रवादी काँग्रेस हा आमच्यासाठी पर्याय नाही. शिवसेनाच आमचा जुना मित्रपक्ष असू  आमच्यामध्ये काही मुद्द्यांवरुन मतभेद असतील पण आमची विचारधारा एकसारखीच आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपाची विचारधारा समान नसल्यामुळे तुर्तास भाजपा – राष्ट्रवादी एकत्र येणे अशक्य असल्याचही यावेळी मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

COMMENTS