मी आज जो काही आहे, तो शरद पवारांमुळेच – दिलीप वळसे पाटील

मी आज जो काही आहे, तो शरद पवारांमुळेच – दिलीप वळसे पाटील

मुंबई – दिलीप वळसे पाटील यांच्या एकसष्ठीनिमित्त आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रिय मंत्री नितीन गडकरी, शरद पवार, अशोक चव्हाण, रामदास आठवले यांच्यासह अनेक दिग्गज नेत्यांनी हजेरी लावली. यावेळी दिलीप वळसे यांच्या वाटचालीवर गौरवग्रंथाचे देखील प्रकाशन करण्यात आले. रामदास आठवले यांच्या काव्यात्मक आणि व्यंगात्मक शुभेच्छांनी उपस्थित नेत्यांसह संपुर्ण सभागृहात हशा पिकला.

यावेळी दिलीप वळसे पाटील म्हणाले की,  ‘मी आज जो काही आहे तो शरद पवारा़मुळेच.. सुरुवातीला ७ ते ८ वर्ष मी शरद पवारांबरोबर मला राज्यात, राज्याबाहेर, देशाबाहेर फिरायची संधी मिळाली. तेव्हा अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. एकदा तर हैद्राबादला अटलबिहारी वाजपेयी, बिजू पटनाईक, पवार साहेब यांच्याबरोबर मी गाडीतून प्रवास केला. पवार मुख्यमंत्री झाले तेव्हा मला विचारले तुला मंत्रालयात काम करण्यात आवड आहे की राजकारणात. मी दोन दिवसांत विचार करून राजकारणात जाण्याची इच्छा बोलून दाखवली. पवारांनी मला आमदारकीचे तिकीट दिले. राज्यात भारनियमन हा परवलीचा शब्द असताना मला ऊर्जामंत्रीपद दिले. त्यानंतर मी ऊर्जा विभागात काम करून ऊर्जा निर्मितीत भरीव काम केले, त्यानंतर केलेल्या कामामुळे सलग सहा वेळा लोकांनी निवडून दिलं. राष्ट्रवादीची सत्ता आल्यानंतर पवार साहेबांनी थेट कॅबिनेट मंत्रीपद दिले. पुणे जिल्ह्यात एवढी स्पर्धा असतानाही मला ही संधी दिली.’ असे वळसे पाटील म्हणाले.
अशोक चव्हाण यांनी दिलीप वळसे यांच्याबद्दल बोलताना दिलीप वळसेंच्या विधानसभेतील उत्कृष्ट कामाचा उल्लेख करत कौतुक केले. या प्रसंगी बोलताना सुप्रिया सुळे भावूक झाल्या होत्या. दिलीप वळसे यांनी आपल्या सत्कार कार्यक्रमात बोलताना त्यांच्या जडणघडणीतील अनेक मान्यवरांचा उल्लेख केला. वडिलांमुळे राजकारणाची आवड निर्माण झाल्याचेही त्यांनी नमुद केले. तसेच शरद पवार यांनी राजकारणात संधी दिल्याचेही त्यांनी सांगितले. याबरोबरच पवार यांच्यासोबत राजकारणाच्या प्रवासातील अनेक आवठणींना आणि काही दुखद आठवणींनाही वळसे यांनी उजाळा दिला.

COMMENTS