मुंबईतील डोंगरी दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया!

मुंबईतील डोंगरी दुर्घटनेवर पंतप्रधान मोदींची प्रतिक्रिया!

नवी दिल्ली – मुंबईतल्या डोंगरी भागात चार मजली इमारत कोसळल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चार जणांचा मृत्यू झाला असून अद्यापही काहीजण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. या घटनेचं गांभीर्य लक्षात घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला आहे.मुंबईतील डोंगरी येथे झालेल्या दुर्घटनेचं दुख: आहे. दुर्घटनेत जीव गमावणाऱ्यांच्या कुटुंबीयांसाठी मी शोक व्यक्त करतो. जखमी लवकर बरे होतील अशी अपेक्षा. महाराष्ट्र सरकार, एनडीआरएफ आणि स्थानिक प्रशासन बचावकार्य करत असून, गरजूंना मदत केली जात असल्याचं ट्वीट मोदींनी केलं आहे.

दरम्यान या घटनेबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. मुंबईतल्या डोंगरी भागात असणारी कौसर बाग ही इमारत पडली असून ती शंभर वर्षे जुनी होती. या इमारतीच्या दुरुस्तीसाठी विकासक नियुक्त केला होता. या ठिकाणी जी कुटुंबं अडकली आहेत त्यांना बाहेर काढणं ही प्राथमिकता आहे. विकासकाने काय केलं? काय केलं नाही? याबाबत चौकशी केली जाईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

तस्च या ठिकाणी महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनीही घटनास्थळाला भेट दिली. यावेळी महापौरांना जनतेच्या रोषाला सामोरं जावं लागलं. या घटनेला कोण जबाबदार आहे याचा जाब स्थानिकांनी त्यांना विचारला. मात्र ही वेळ दोषी कोण हे शोधण्याची नसून जे ढिगाऱ्याखाली अडकले आहेत त्यांना वाचवण्याची असल्याचं महापौरांनी म्हटले आहे.

COMMENTS