पंतप्रधान मोदींचे ‘ते’ वक्तव्य देश घडवणा-या सगळ्यांचा अपमान करणारे – राहुल गांधी

पंतप्रधान मोदींचे ‘ते’ वक्तव्य देश घडवणा-या सगळ्यांचा अपमान करणारे – राहुल गांधी

मुंबई – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे वक्तव्य देश घडवणा-या सगळ्यांचा अपमान करणारे असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. २०१४ पर्यंत म्हणजेच ते पंतप्रधान म्हणून सत्तेवर येईपर्यंत देशाचा विकासच झाला नसल्याचं मोदींनी म्हटलं आहे. तसेच त्यावेळी देश निद्रीस्त अवस्थेत होता. असंही मोदींनी म्हटलं आहे. या वक्तव्यावरुन राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींवर टीका केली आहे.

दरम्यान भारताचा विकास करण्यात, देशाची बांधणी करण्यात अनेकांनी हातभार लावला आहे. त्यामध्ये स्वातंत्र्यसैनिकांचाही समावेश होतो. मात्र २०१४ पर्यंत कोणताही विकास झाला नाही असे म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देश घडवणाऱ्या सगळ्यांचा अपमान केला असल्याचं राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

दरवर्षी २ कोटी बेरोजगारांना आम्ही रोजगार देऊ, शेतकऱ्यांना योग्य हमीभाव देऊ, भ्रष्टाचाराचे समूळ उच्चाटन करू अशी अनेक आश्वासने पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या भाषणांमधून द्यायचे. आता मात्र या सगळ्याबद्दल ते बोलत नसल्याची टीकाही राहुल गांधी यांनी केली आहे.

 

COMMENTS