सदाभाऊ खोत यांना धक्का, रयत क्रांती संघटनेला खिंडार !

सदाभाऊ खोत यांना धक्का, रयत क्रांती संघटनेला खिंडार !

मुंबई – कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना गुरुवारी त्यांच्याच रयत क्रांती संघटनेकडून दणका बसला असून संघटनेला खिंडार पडलं आहे. रयत क्रांती संघटनेची रयत क्रांती शेतमजूर संघटना बरखास्त करत असल्याची माहिती संघटनेचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष सुरेश सासणे यांनी केली आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला लागलेले सदाभाऊ खोत यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.

दरम्यान राज्यात २ कोटी शेतमजूर असून एकट्या शिरोळ तालुक्यात ८४ हजार शेतमजूर आहे. मंत्री खोत यांच्याकडे शेतमजूरांच्या मागण्यांसाठी वारंवार पाठपुरावा करूनही त्यांनी केराची टोपली दाखवल्यामुळे आम्ही या संघटनेतून बाहेर पडत असल्याचं ससाणे यांनी म्हटलं आहे. यावेळी ससाणे यांच्यासोबत शिरोळ, हातकणंगले तालुक्यातील संघटनेच्या अन्य प्रमुख पदाधिकार्‍यांनीही राजीनामे सादर केल्याने खोत यांच्या रयत क्रांती संघटनेला खिंडार पडले आहे.

शेतमजूरांसाठी स्वतंत्र कल्याणकारी मंडळ स्थापन करावे ही मागणी आमची होती. त्या संदर्भात महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीतून सकारात्मक तोडगा निघेल अशी आशा निर्माण झाली आहे. परंतु या बैठकीवेळी अथवा बैठकीनंतरही मंत्री खोत यांनी महामंडळासाठी काहीच प्रयत्न केले नाहीत. वारणानगर येथे झालेल्या शेतकरी, शेतमजूर परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतमजूर स्वतंत्र कल्याणकारी मंडळ घोषित करणार असल्याचे खोत यांनी सांगितले होते, पण त्याबाबत चकार शब्द उच्चारला गेला नसल्याने आम्ही व्यासपीठ सोडले होते. खोत यांची कामकाज पध्दत पाहता भविष्यातही शेतमजूरांना न्याय मिळणार नाही अशी खात्री झाल्याने ही संघटना बरखास्त केली असल्याचंही सासणे यांनी सांगितले.

COMMENTS