संजय निरुपम यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, फेरीवाल्यांची याचिका फेटाळली

संजय निरुपम यांना सर्वोच्च न्यायालयाचा दणका, फेरीवाल्यांची याचिका फेटाळली

नवी दिल्ली -मुंबईतील फेरीवाल्यांना पाठिंबा देणारे काँग्रेस नेते संजय निरुपम यांना सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. फेरीवाल्यांना पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत त्यांना हटवू नये, तसंच मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती द्यावी, अशी मागणी करणारी त्यांची याचिका न्यायालयाने फेटाळली आहे.

एलफिन्स्टन दुर्घटनेनंतर मनसेने रेल्वे स्थानक परिसरात बेकायदा व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांविरोधात ठिकठिकाणी आंदोलन केलं होतं. तर संजय निरुपम यांनी फेरीवाल्यांना पाठिंबा दिला होता. फेरीवाल्यांच्या संघटनेनं उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती. फेरीवाले कुठेही बसून व्यवसाय करू शकत नाहीत. त्यांना फेरीवाला क्षेत्रातच व्यवसाय करण्याची परवानगी आहे. तसंच पादचारी पूल आणि रेल्वे स्थानकाच्या150 मीटर परिसरात फेरीवाल्यांना व्यवसाय करता येणार नाही, असा निर्णय न्यायालयाने दिला होता.या निर्णयाला निरुपम यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे आव्हान दिले होते. उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती देण्यात यावी, तसंच पर्यायी व्यवस्था उपलब्ध करून दिली जात नाही, तोपर्यंत फेरीवाल्यांना हटवू नये, अशी मागणी त्यात केली होती. मात्र, उच्च न्यायालयाचा निर्णय योग्य असल्याचं सांगून सर्वोच्च न्यायालयानं ही याचिका फेटाळली आूहे.

 

 

COMMENTS