दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, 10 मतदारसंघातील 20 हजार 716 मतदान केंद्रांवर मतदान !

दुसऱ्या टप्प्याच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज, 10 मतदारसंघातील 20 हजार 716 मतदान केंद्रांवर मतदान !

मुंबई – राज्यात दहा मतदारसंघात उद्या गुरुवार दि. 18 एप्रिल रोजी लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्याचे मतदान होत आहे. त्यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज झाली असून मतदान केंद्रांसाठी नियुक्त केलेले कर्मचारी आज रवाना झाले. दुसऱ्या टप्प्यात 1 कोटी 85 लाख 46 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावतील. या टप्प्यात एकूण 179 उमेदवार असून 20 हजार 716 मतदान केंद्र आहेत; तर त्यापैकी सुमारे 2100 मतदान केंद्रांचे लाइव्ह वेबकास्ट होणार आहे.

या टप्प्यातील सर्वाधिक 36 उमेदवार बीड मतदार संघात असून सर्वात कमी 10 उमेदवार लातूर मतदार संघात आहेत. याव्यतिरिक्त बुलढाणा मतदारसंघात 12 उमेदवार, अकोला 11, अमरावती 24, हिंगोली 28, नांदेड 14, परभणी 17, उस्मानाबाद 14 आणि सोलापूर मतदारसंघात 13 उमेदवार निवडणूक लढवित आहेत, अशी माहिती अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी दिली.

15 पेक्षा जास्त उमेदवार असलेले 4 मतदार संघ असून यापैकी बीड मतदार संघात एका कंट्रोल युनिटमागे 3 बॅलेट युनिट, अमरावती, अकोला आणि परभणी मतदार संघात प्रत्येकी दोन बॅलेट युनिट तर अन्य 6 मतदार संघात प्रत्येकी 1 बॅलेट युनिट लागणार आहेत. या निवडणुकीसाठी 62 हजार 700 ईव्हीएम ( 37 हजार 850 बॅलेट युनिट आणि 24 हजार 850 कंट्रोल युनिट) तर सुमारे 27 हजार व्हीव्हीपॅट यंत्रे देण्यात आली आहेत.

निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, उन्हापासून बचावासाठी सावलीची व्यवस्था, प्रत्येक विधानसभा मतदान केंद्रात सखी मतदान केंद्र अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

सुमारे 10 टक्के मतदान केंद्रांवरील मतदान प्रक्रियेचे लाइव्ह वेबकास्ट केले जाणार असून जिल्हा निवडणूक अधिकारी, राज्यस्तरावर मुख्य निवडणूक अधिकारी आणि भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी, संबंधित मतदार संघांचे केंद्रीय निवडणूक निरीक्षक हे लाइव्ह वेबकास्ट पाहतील.

दुसऱ्या टप्प्यात मतदान होणारे मतदार संघ : बुलढाणा- 1979 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 59 हजार), अकोला – 2085 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 61 हजार), अमरावती – 2000 मतदान केंद्र, (एकूण मतदार 18 लाख 30 हजार), हिंगोली- 1997 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 32 हजार), नांदेड – 2028 मतदान केंद्र (एकूण मतदार 17 लाख 18 हजार), परभणी – 2174 मतदान केंद्र (एकूण मतदार 19 लाख 84 हजार), बीड – 2325 मतदान केंद्र (एकूण मतदार 20 लाख 41 हजार), उस्मानाबाद – 2127 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 86 हजार), लातूर – 2075 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 83 हजार), सोलापूर – 1926 मतदान केंद्र (एकूण मतदार 18 लाख 50 हजार).

मतदान करण्यासाठी मतदाराचे नाव मतदार यादीत असणे गरजेचे आहे. त्याशिवाय मतदान करता येणार नाही. निवडणूक आयोगाच्या ओळखपत्राशिवाय अन्य अकरा प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणतेही एक ओळखपत्र दाखवून मतदान करता येईल, असेही श्री. शिंदे यांनी सांगितले.

मतदानासाठी आवश्यक 11 दस्तावेज

मतदानासाठी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र नसेल आणि मतदार यादीत नाव असेल तर अशा वेळी अन्य अकरा प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल. यामध्ये पासपोर्ट (पारपत्र), वाहन चालक परवाना, छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम, सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे ओळखपत्र), छायाचित्र असलेले बँकांचे पासबूक, पॅनकार्ड, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर) अंतर्गत महसूल निर्मिती निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड, मनरेगा कार्यपत्रिका, कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज, खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र आणि आधारकार्ड यांचा समावेश आहे.

COMMENTS