शिर्डी संस्थानकडून राज्य सरकारला 500 कोटींचं बिनव्याजी कर्ज !

शिर्डी संस्थानकडून राज्य सरकारला 500 कोटींचं बिनव्याजी कर्ज !

मुंबई – राज्य सरकारला 500 कोटींचं बिनव्याजी कर्ज देण्याचा निर्णय शिर्डी संस्थाननं घेतला असल्याची माहिती आहे. निळवंडे येथील सिंचन योजना पूर्ण करण्यासाठी ही मदत देण्यात आली आहे. या योजनेमुळे अहमदनगर जिल्ह्यातील काही तालुक्यांची पाणी समस्या सुटण्यास मदत होणार आहे. शिर्डी देवस्थान ट्र्स्टचे अध्यक्ष आणि भाजपा नेते सुरेश हावरे यांनी राज्य सरकारला सिंचन योजनेसाठी कर्ज मागितल्यानंतर ही परवानगी दिली आहे.विशेष म्हणजे सरकारला इतक्या मोठ्या प्रमाणावर कोणत्याही देवस्थानने यापूर्वी बिनव्याजी कर्ज दिले नव्हते. परंतु पहिल्यांदाच शिर्डी संस्थाननं सरकारला मदतीचा हात दिला आहे.

दरम्यान या कर्जाच्या परतफेडीसाठी कोणताही कालावधी निश्चित करण्यात आलेला नसल्याची माहिती आहे. याच वर्षी फेब्रुवारी महिन्यात मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका बैठकीद्वारे या कर्जाचा प्रस्ताव मंजूर केला होता, त्यानंतर कर्जाची रक्कम अदा करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. निळवंडे सिंचन प्रकल्प बऱ्याच काळापासून रखडला आहे. या प्रकल्पाची एकूण किंमत सुमारे १२०० कोटी रुपये आहे. त्यासाठी मंदिर ट्रस्ट ५०० कोटी रुपये देणार आहे.

या प्रकल्पासाठी जलसिंचन विभागाकडून यंदाच्या बजेटमध्ये ३०० कोटींची तरतूद केली आहे. तर पुढील वर्षासाठी ४०० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. दरम्यान, दोन वर्षात या प्रकल्पातील कालव्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असल्याची माहिती आहे.

 

COMMENTS