भारत बंद यशस्वी व्हावा, 2019 मध्ये सत्ताधा-यांचे लंका दहन होणारच – शिवसेना

भारत बंद यशस्वी व्हावा, 2019 मध्ये सत्ताधा-यांचे लंका दहन होणारच – शिवसेना

मुंबई – विरोधी पक्षांनी पुकारलेला भारत ‘बंद’ यशस्वी व्हायला हवा असं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. काँग्रेस पुरस्कृत भारत बंदच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी ‘सामना’ संपादकीयमध्ये भाजपचा समाचार तर विरोधकांनाही उपदेशाचे डोस दिले आहेत. जनता जागीच आहे. ती 2019 साली सत्ताधा-यांचे लंका दहन करील. भडकलेल्या महागाईवर आणि जनतेच्या होरपळीवर भाजप नेते कधी बोलणार ?  असा सवाल ठाकरे यांनी केला आहे.

दरम्यान आम्हाला महागाईत होरपळणाऱ्या जनतेविषयी सहानुभूती आहे. जनतेचा आवाज बनून आम्ही सरकारात आकांडतांडव केले. विरोधी पक्षांचे ओझे आजपर्यंत आम्हीच वाहत राहिलो. आता आम्हाला विरोधी पक्षांची ताकद पाहायची आहे. विरोधी पक्षांतील तोंडपाटलांनाही हे कळू द्या की, ते नेमके कुठे आहेत ? जनतेसाठी पुकारलेला ‘बंद’ हा नुकतेच झोपेतून उठलेल्यांचा ‘बंद’ ठरू नये. देशभरातील अनेक प्रादेशिक पक्ष या बंदमध्ये सामील होत असल्याने हा ‘बंद’ काही प्रमाणात नक्की यशस्वी होईल. तसा तो व्हायला हवा. राष्ट्रीय जनता दल, बहुजन समाज पार्टी, समाजवादी पार्टी हे पक्ष ‘बंद’मध्ये उतरले आहेत. त्यामुळे उत्तर हिंदुस्तानात ‘बंद’चा प्रभाव शंभर टक्के जाणवेल असंही ठाकरे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान ‘बंद’ची घोषणा राजकीय कारणासाठी नसून जनजीवनाशी संबंधित महागाईवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आहे. जनतेच्या प्रश्नांवर तरी विरोधी पक्षांचे गाठोडे नीट बांधले जात आहे काय ते ‘बंद’च्या निमित्ताने स्पष्ट होईल असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

COMMENTS