कोकणातील लोकांसाठी वेळ पडली तर मंत्रिपद सोडून देईन -सुभाष देसाई

कोकणातील लोकांसाठी वेळ पडली तर मंत्रिपद सोडून देईन -सुभाष देसाई

मुंबई – कोकणातील लोकांसाठी वेळ पडली तर मंत्रिपद सोडून देईन असं वक्तव्य उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी केलं आहे. कोकणातील नाणार प्रकल्पासंदर्भात बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे. आम्ही बैठक घेऊन एकत्रित निर्णय घेऊ, सरकारचा निर्णय एकच असेल असं देसाई यांनी म्हटलं आहे. नाणार रिफायनरीमुळे तेथील ग्रामव्यवस्थाच नाही तर परिसरामधील निसर्ग, आंबा उद्योग नष्ट होणार आहेत. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांचा मोठा विरोध असून हा प्रकल्प रद्द करणार का ? असा सवाल विधानपरिषदेत आमदार हुस्नाबानू खलिफे यांनी केला होता. त्यावर देसाई बोलत होते.

दरम्यान या प्रकल्पाला विरोध असल्याने भूसंपादन प्रक्रिया थांबवली आहे. नाणार आणि परिसरामधील ग्रामस्थांनी प्रकल्पाविरोधात ठराव केले आहेत, प्रकल्प रद्द करावा याबाबत मोठी मागणी आहे. शेवटी हा केंद्राचा प्रकल्प आहे. तेव्हा रद्द करण्याबाबत मुख्यमंत्री निर्णय घेतील. सध्या मोठा विरोध असल्याने उद्योग विभागाचे म्हणणे आहे की या प्रकल्पाबाबत भुसंपादन करणे अशक्य आहे. असं सुभाष देसाई यांनी म्हटलं आहे. तसेच मुख्यमंत्री म्हणतात की प्रकल्प होणारच. उद्योगमंत्री वेगळे म्हणतात. या सरकारमध्ये दोन वेगळे मतप्रवाह आहेत हेच यावरून दिसून येत असल्याची टीका जयंत पाटील यांनी केली आहे.

 

COMMENTS