आता यशवंत सिन्हा देशद्रोही ठरतील –  शिवसेना

आता यशवंत सिन्हा देशद्रोही ठरतील – शिवसेना

मुंबई – यशवंत सिन्हांच्या लेखावर आम्हाला काहीही म्हणायचे नाही. मात्र, आम्ही तेच वर्षभरापूर्वीच सांगितले होते. तेव्हा आम्ही देशद्रोही ठरलो होतो. आता यशवंत सिन्हा ठरतील, असा हल्ला शिवसेनेने केला आहे.

सामना या मुखपत्रात सेनेने केंद्र सरकारवर हल्लाबोल चढवला. गुजरातच्या विकासाचे काय झाले? असा सवाल करताच ‘विकास गांडो थयो छे!’ म्हणजे ‘विकास वेडा झाला आहे,’ असे उत्तर आता गुजराती जनता देत आहे. फक्त गुजरातच कशाला, संपूर्ण देशभरातच ‘विकास गांडो थयो छे’ म्हणजे विकास वेडा झाल्याचे चित्र भारतीय जनता पक्षाचेच वरिष्ठ मंडळ समोर आणीत आहेत, असे सेनेने लक्षात आणून दिले.

‘‘विकासाबाबत काहींनी पुष्कळ थापा मारल्याने विकास वेडा झाला असावा,’’ अशी शहाणपणाची टिप्पणी राहुल गांधी यांनी केली आहे. ई.व्ही.एम. मशीनमध्ये घोटाळे करून व पैशांचा वापर करून निवडणुका जिंकल्या म्हणजे विकास झाला असे काहींना वाटत आहे, पण विकासाची अवस्था बिकट झाली आहे. मनमोहन सिंग, चिदंबरम अशा ‘अर्थतज्ञां’नी कालपर्यंत हेच सांगण्याचा प्रयत्न केला तेव्हा मनमोहन सिंग व चिदंबरम हेच ‘गांडो थयो छे’ असे सांगण्याचा प्रयत्न झाला. मात्र आता अर्थमंत्री पदावर प्रदीर्घ काळ राहिलेले हे लोक मूर्ख व आपण तेवढे शहाणे या भ्रमाचा भोपळा यशवंत सिन्हा या भाजपच्याच माजी अर्थमंत्र्यांनी फोडला आहे. देशाचा विकास दर हा 5.7 टक्के असल्याचे सांगितले जाते. तो प्रत्यक्षात 3.7 टक्केच असल्याचे बिंग फोडल्याबद्दल यशवंत सिन्हा हे बेईमान किंवा राष्ट्रद्रोही ठरवले जाऊ शकतात, असे सेनेने लिहिले आहे.

 

COMMENTS