राजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना टोला

राजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींना टोला

राजकारण आणि समाजकारणात कोणीच कोणाला मोठं करत नाही अथवा संपवत ही नाही. तर जो तो ज्याच्या त्याच्या कर्माने मोठा आणि छोटा होत असतो. असे म्हणत पुन्हा एकदा राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी राजू शेट्टींना टोला हाणला. पिंपरी चिंचवडच्या सांगवीतील शेतकरी आठवडी बाजाराच्या उदघाटनाला यावेळी उपस्थिती लावली होती. तसेच मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेल्या शिवारावरील संवाद यात्रेत सहभागी होणार असल्याचं ही खोत यांनी जाहीर केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना फसवलं असल्याची टीका शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली होती. याला उत्तर देताना राज्यमंत्री सदाभाऊ म्हणाले की, कोण काय म्हणत आहे याकडे लक्ष द्यायला मला आता वेळ नाही, माझं लक्ष हे राज्यातील शेतकरी त्याची शेती आणि सर्वसामान्याच्या प्रश्नाकडे आहे. हे सर्व डोळ्यासमोर ठेऊन काम करत असल्याचे त्यांनी सांगितले. कोणी काय समजावं आणि काय नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. आम्ही स्पष्ट दिशा घेऊन काम करत आहे. मी राज्यातील शेतकऱ्यांबरोबर संवाद साधत त्यांच्या सोबत चालत आहे अस म्हणत त्यांनी शेतकरी संवाद यात्रेत सहभागी होणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहे.

COMMENTS