विधान परिषदेत शाळांच्या मुद्द्यावरुन गदारोळ, दोन वेळा कामकाज तहकूब

विधान परिषदेत शाळांच्या मुद्द्यावरुन गदारोळ, दोन वेळा कामकाज तहकूब

नागपूर – विधान परिषदेत शिक्षणाच्या मुद्द्यावरुन विरोधक चांगलेच आक्रमक झाले होते. या मुद्द्यावरुन विधान परिषदेचं कामकाज दोन वेळा तहकूबही करण्यात आलं होतं. शिक्षण आणि शिक्षकांच्या प्रश्नांवरुन विरोधक आणि शिक्षमंत्री विनोद तावडे यांच्यात चांगलीच खडाजंगी झाली होती. त्यावेळी राज्यातील १३०० शाळा बंद करून राज्य सरकार राज्यातील शैक्षणिक व्यवस्थाच नष्ट करण्याच्या मार्गावर असल्याचा आरोप विरोधी पक्षातील आमदार श्रीकांत देशपांडे, डॉ. सुधीर तांबे, विक्रम काळे, नागो गाणार, कपिल पाटील यांनी केला.

विरोधकांच्या या आरोपानंतर शिक्षणमंत्री विनोद तावडेंनी त्यांना उत्तर दिलं. शाळा बंद केल्या नाहीत, तर पटसंख्या कमी झाल्यामुळे  एक कि.मी. परिसरात स्थानांतरित केल्या आहेत. त्यामुळे मुलांचे नुकसान झाले नाही. चार मुले एका शाळेत असतील तर त्या बंद करणार नाही का? असा सवाल करीत त्यांनी कपिल पाटील हे खोटे बोलत असल्याचा आरोप केला. तसेच  फुले, शाहू, आंबेडकर यांनी दाखवलेल्या मार्गानेच शिक्षणाचे काम आम्ही करीत आहोत, असे तावडे म्हणाले. अनुदानाचा प्रश्न आघाडी सरकारच्या काळातलाच असून युती सरकारनेच प्रथम त्यांना २० टक्के अनुदान दिले असून टप्प्याटप्प्याने त्यांना अनुदान दिले जाणार असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी म्हटलं आहे..

तसेच संस्थाचालक शिक्षकांकडून पैसे घेतात. त्यामुळे निधीची तरतूद झाल्यावरच कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांची यादीही जाहीर करा, अशी विनंती शिक्षक आमदारांनीच केल्याचे तावडे यांनी त्यावेळी म्हटले आहे.विनोद तावडेंनी दिलेल्या उत्तराचं समाधान न मानत पुन्हा या आमदारांनी जोरदार घोषणाबाजी करण्यास सुरुवात केली. त्यामुळे विधानपरिषदेचं कामकाज दोन वेळा तहकूब करण्यात आलं.

 

 

COMMENTS