अनेक दिवसानंतर शिवसेनेकडून भाजपचं अभिनंदन !

अनेक दिवसानंतर शिवसेनेकडून भाजपचं अभिनंदन !

मुंबई – ईशान्य भारतातील तीन राज्यात झालेल्या विधानसभा निवडणुकांच्या निकालांवर शिवसेनेनं आपली प्रतिक्रिया दिली असून यामध्ये अनेक दिवसानंतर शिवसेनेनं भाजपचं अभिनंदन केलं आहे. हा विजय म्हणजे वाळवंटातून केशराचे पीक काढण्यासारखं आहे. म्हणून या विजयाला महत्त्व असून उत्तर प्रदेश, गुजरातमधला विजय सोपा असतो. तिथे पक्षाची बांधणी आहे. राम मंदिर, गोध्रासारखे विषय असतात फोडणी द्यायला. पण त्रिपुरा नागालँडसारख्या राज्यात जाऊन काम करणं, पक्ष उभा करणं आणि विजय मिळवणं ही नक्कीच अभिमानाची गोष्ट असते. सत्ता परिवर्तन होणं गरजेचं होते. या राज्यांना देशाच्या मुख्य प्रवाहात आणणं गरजेचं होतं. त्यामुळे भाजपचा हा विजय महत्त्वाचा वाटत असल्याचं सामना या मुखपत्रातून शिवसेनेनं अभिनंदन केलं आहे.

तसेच खासकरून त्रिपुराचा विजय जिथे बहुमत मिळालं. कम्युनिस्टांची राजवट उलथवून टाकली. आपल्या मराठी माणसाने सुनील देवधर यांनी हे केलं. त्रिपुराच्या विजयाने एक दाखवून दिलं की भारतीय जनता पक्षात कुणी तरी तिसरा माणूस सुद्धा आहे. आता पर्यंत आम्हाला वाटायचे की मोदी आणि शाह विजय मिळवू शकतात. पण हा तिसरा आदमी त्रिपुरात उदयाला आला. गेल्या चार-पाच वर्षांत प्रचंड कष्ट मेहनत, टीम वर्क करून भाजपला हा विजय मिळवून दिला त्यामुळे त्यांचंही अभिनंदन. श्रेय सर्वांचं. हा विजय पक्षाचा असतो, पक्षाच्या विचारांचा असतो भूमिकेचा असतो. पण असे विजय मग पश्चिम बंगाल, तामिळनाडूमध्ये का नाही मिळाले ? हेच नेते आहेत. पण एक कार्यकर्ता जातो. चार पाच वर्षं पक्षाचा झेंडा घेऊन तिथे ठाण मांडून बसतो. आणि वाळवंटात केशराचे पीक काढतो. त्यामुळे ही त्रिपुरा पौर्णिमा आहे. या विजयाला देशाच्या विजयाच्या दृष्टीने महत्त्व आहे. तसेच देशाच्या राजकारणावर किंवा निकालांवर परिणाम करणारा हा निकाल नक्कीच नसून देशाच्या राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचा निकाल असल्याचंही शिवसेनेनं म्हटलं आहे.

आशिष शेलार यांच्या ट्विटवर संजय राऊत यांचे उत्तर

ज्यांच्या डोक्यात अशी घाण असते तेच असा विचार करतात. आम्ही चांगल्याला चांगलं म्हणणारे लोक आहोत. ईशान्य भारतातील भाजपचे यश आम्ही राजकारणापलीकडे पाहातो. कारण सातही राज्य देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाची आहेत. आणि तिथे राष्ट्रीय विचारांचा पगडा असलेला एक पक्ष उभा राहतो आणि जिंकून येतो तेव्हा ते निकाल देशासाठी महत्वाचे आहेत. जम्मू काश्मीरमध्ये भारतीय जनता पक्षाचे संपूर्ण राज्य येईल तेव्हा आम्ही त्यांचे स्वागत करू. आमचा विरोध मेहबुबा मुफ्ती बरोबरच्या सरकारला आहे. आम्ही खुश आहोत. नाखूष होण्याइतके आमचे मन नक्कीच घाणेरडे नाहीये. पण ज्यांच्या डोक्यात किडे वळवळत असतात ते नाखूष असतात असं उत्तर संजय राऊत यांनी आशिष शेलारांना दिलं आहे.

COMMENTS