एसटीचे स्मार्ट कार्ड घ्या आणि कुटुंबातील कोणीही प्रवास करा !

एसटीचे स्मार्ट कार्ड घ्या आणि कुटुंबातील कोणीही प्रवास करा !

मुंबई – एसटी बसच्या प्रवाशांसाठी आता राज्य शासनानं स्मार्ट कार्ड योजना अंमलात आणली आहे. या स्मार्ट कार्ड योजनेमुळे एसटी बसचं तिकीट काढणं सोपं होणार आहे. विशिष्ट रक्कम भरुन घेतलेले स्मार्ट कार्ड आपल्या बरोबरच कुटुंबातील व्यक्ती व इतरांनाही प्रवासासाठी वापरता येईल, अशी सुविधा देणारी ‘कॅशलेस स्मार्ट कार्ड’ योजना लवकरच एसटीच्या प्रवाशांना उपलब्ध करुन देणार असल्याची घोषणा मा. परिवहन व खारभूमी विकास मंत्री तथा, एसटी महामंडळाचे अध्यक्ष, श्री. दिवाकर रावते यांनी केली आहे.

या योजनेंतर्गत प्रवाशांना 50 रुपयांचे स्मार्ट कार्ड घेऊन त्यावर सुरुवातीला किमान 500 रुपये इतकी रक्कम भरणे आवश्यक आहे. त्यानंतर पुनर्भरणा रक्कम 100 रुपयांच्या पटीत असणार आहे. या योजनेचा लाभ प्रवाशांना 1 मे म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून प्रत्येक आगारात जाऊन घेता येणार आहे.

एसटीच्या प्रवासाला निघाले की, सुट्टे पैसे आहेत का? नेमके पैसे द्या, किती जणांना मी मोड देऊ! असे वाहकाचे नानाविध प्रश्न डोळ्यासमोर उभे राहतात. या सर्वातून प्रवाशांची सुटका करण्यासाठी एसटी महामंडळाने स्मार्ट कार्ड योजना आणली आहे. त्यानुसार ठराविक रकमेचे स्मार्ट कार्ड घेऊन त्याद्वारे त्या रकमेइतका एसटीचा कोणत्याही म्हणजेच साधी, रातराणी,हिरकणी, शिवशाही, शिवनेरी व अश्वमेध बसेसने प्रवास करणे आता प्रवाशांना शक्य होणार आहे. त्यामुळे खिशात सुट्टे पैसे आहेत की नाहीत, याची चिंता करण्याची गरज नाही.

विशेष म्हणजे हे स्मार्ट कार्ड एका व्यक्तीने काढले तरी त्याच्या कुटुंबातील व मित्रांपैकी कोणीही प्रवासाला जातांना हे कार्ड वापरु शकतात. तसेच कितीही व्यक्तींची तिकीटे काढू शकतात. अर्थात, प्रत्येक व्यक्तीने जितका प्रवास केला तितके पैसे त्या कार्डमधून वजा होत राहतील. हे कार्ड नंतर रिचार्ज करण्याची सुविधा असून, घरबसल्या देखील ऑनलाईन रक्कम या कार्डवर भरणा केली जावू शकते.

COMMENTS