आतापर्यंत ३१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ –सुभाष देशमुख

आतापर्यंत ३१ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ –सुभाष देशमुख

मुंबई – राज्य शासनाने जाहीर केलेल्या छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान कर्जमाफी योजनेंअंतर्गत आतापर्यंत ३१ लाख ३२ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम वितरित करण्यात आली असल्याची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष तथा सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी मंगळवारी दिली आहे. मंत्रालयात श्री. देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या अंमलबजावणीसाठी नेमलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत त्यांनी ही माहिती दिली आहे.

या योजनेंतर्गत दाखल झालेल्या अर्जातील 47.73 लाख खात्यावर (Green List) कर्जमाफी व प्रोत्साहनपर लाभ मंजुर केला असून त्यासाठी सुमारे 23 हजार 102 कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. यापैकी 5 फेब्रुवारी अखेर 31.32 लाख कर्ज खात्यांवर लाभापोटी 12 हजार 362 कोटीची रक्कम वितरित करण्यात आली आहे. मंजूर करण्यात आलेल्या एकूण 47.73 लाख कर्ज खात्यांपैकी बँकांकडून काही खात्यावरील माहिती अद्ययावत करुन पुन:श्च पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत अर्ज केलेल्या शेतकऱ्यांची माहिती व बँक खात्यांची माहिती यांची पडताळणी केली असता जी कर्ज खाती योजनेच्या निकषात बसत नाहीत अशा एकूण 4.77 लाख (Yellow List) कर्ज खात्यांबाबतची माहिती पोर्टलद्वारे बँकांना पडताळणीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली होती. अशा कर्ज खात्यांची पडताळणी बँकांमार्फत करण्यात आली असून सुमारे १ लाख ७५ हजार खात्यांची तपासणी करुन फेर प्रक्रियेसाठी पोर्टलवर अपलोड करण्यात आलेली आहेत.

योजनेमध्ये अर्ज दाखल केलेल्या ज्या शेतकऱ्यांची माहिती बँकेकडील माहितीशी जुळली नाही अशा शेतकऱ्यांच्या खात्यांच्या माहितीची शहानिशा करुन निर्णय घेण्यासाठी तालुकास्तरीय समित्या गठित करण्यात आल्या असून अशा तालुकास्तरीय समितीद्वारे निर्णय प्रक्रियेसाठी 21.69 लाख कर्जखाती (unmatch application data) ऑनलाईन पद्धतीने उपलब्ध करुन देण्यात आलेली आहेत. यापैकी बँकांनी काल दि. 5 फेब्रुवारी अखेर एकूण 5.65 लाख खात्यांची माहिती अपलोड केलेली आहे. या खात्यांबद्दलची नमुना १ ते ६६ मध्ये भरलेली माहिती बँकांनी पोर्टलवर पात्र/अपात्रतेसह नोंद करुन अपलोड करावयाची असून त्यानंतर अशा खात्यांबाबत मंजूर/नामंजूरीचे निर्णय घेऊन पोर्टलवर अपलोड करण्याची कार्यवाही तालुकास्तरीय समितीमार्फत चालू आहे. तसेच या योजनेअंतर्गत लाभ मिळालेल्या अथवा न मिळालेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या तक्रारी ऑनलाईन पद्धतीने सादर करण्याची कार्यप्रणाली तयार करण्याचे काम चालू असल्याची माहिती देशमुख यांनी यावेळी दिली आहे.

 

COMMENTS