हिम्मत असेल तर गोवा शाकाहारी राज्य बनवा; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीकास्त्र

हिम्मत असेल तर गोवा शाकाहारी राज्य बनवा; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीकास्त्र

मुंबई – शिवसेनेने पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे. छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रातच पुन्हा एकदा मराठी माणसाला डिवचण्याचे कारस्थान सुरू झाले. मुंबई आणि अलीकडच्या महापालिका निवडणुकांतही जात आणि धर्माचा विखारी प्रचार झाला. वास्तविक जैन समाज म्हणा किंवा बांधव, आम्ही कधीच त्यांच्या अंगावर गेलो नाही. उलट आजपर्यंत सगळय़ांनाच हिंदू म्हणून सांभाळून घेत आलो. मात्र अलीकडे महाराष्ट्रात आम्ही काय खावे व खाऊ नये, हे सांगण्यापर्यंत यांची मजल गेली, असे सांगतानाच बाजूच्याच गोव्याला जाऊन जरा बघा. भाजपच्याच राज्यात इथे मुबलक ‘बीफ’ मिळत आहे. इथे महाराष्ट्रात आम्हाला शहाणपणा शिकवणाऱ्यांनी गोव्यात जाऊन पूर्ण शाकाहारी राज्य आणावे. बोला, आहे का हिंमत?, असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक ‘सामना’तील अग्रलेखातून शिवसेनेने गणेशोत्सवाच्या शुभेच्छा देतानाच भाजपवर टीकास्त्र सोडले आहे.

‘इथे तुम्ही एकगठ्ठा मतांची मस्ती दाखवणार असाल तर ती तुम्हालाच लखलाभ ठरो. पण पैशाची मस्ती दाखवून अंगावर याल तर, ते मात्र आता मराठी माणूस सहन करणार नाही. व्होट बँकेच्या गलिच्छ राजकारणासाठी मनी, मुनी आणि बुवांचा गैरवापर महाराष्ट्रात सुरू झाला आहे. मराठी माणसाला आव्हान देण्यासाठीच ही सगळी थेर सुरू आहेत, असे सांगतानाच गणराया, हे विघ्न घालवण्यासाठी मराठी माणसाला पुन्हा एकदा शक्ती दे! मुठभरांच्या धनशक्तीचा माज उतरवण्यासाठी मराठी जनतेला वज्रमूठ आवळून आपले शौर्य आणि तेज दाखवावेच लागेल. गणेशोत्सवाच्या माध्यमातून गणेश मंडळांनीही यावर जागरण घडवायला हवे,’ असे आवाहनच उद्धव ठाकरे यांनी केले आहे.

 

 

COMMENTS