जम्मू-काश्मिरमध्ये सरकार गेले, पण आमदारांना अच्छे दिन आले !

जम्मू-काश्मिरमध्ये सरकार गेले, पण आमदारांना अच्छे दिन आले !

नवी दिल्ली – जम्मू-काश्मीरमध्ये भाजपाने अचानक पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे त्याठिकाणंच पीडीपी सरकार पडलं असून याठिकाणी कुठलाच पक्ष सरकार स्थापन करण्याच्या स्थितीत नसल्यामुळे राज्यपाल राजवट लागू करण्यात आली आहे. येथील विधानसभा निलंबित करण्यात आली असली तरी याठिकाणच्या  आमदारांना मात्र अच्छे दिन आले असल्याचं दिसत आहे. सरकार पडलं असलं तरी आमदारांना मिळणा-या सर्व सुख सुविधा सुरु आहेत. सरकार पडल्यामुळे या आमदारांनी फक्त कायदा बनवण्याचा अधिकार गमावला आहे. विधानसभा निलंबित असली तरी त्याचा आमदारांच्या वेतनावर, भत्त्यांवर कोणताही परिणाम होणार नसून त्यांना त्यांचे पगार, भत्ते सुरुच राहणार आहेत. त्यामुळे काम न करता या आमदारांना पैसे मिळणार आहे.

दरम्यान देशाच्या अन्य राज्यांमध्ये अशी स्थिती उदभवल्यानंतर राष्ट्रपती राजवट लागू केली जाते परंतु जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा असल्यामुळे त्यांच्यासाठी वेगळा कायदा आहे. त्यामुळे याठिकाणी राज्यपाल राजवट लागू होते. परंतु यासाठी राष्ट्रपतींची परवानगी घेणं अनिवार्य असतं. तसेच याठिकाणी सरकार बनू शकतं असं राज्यापालांना वाटलं तरच विधासभेचे निलंबन मागे घेतले जाऊ शकते. परंतु सहा महिने जर अशीच स्थिती राहिली तर राज्यपाल विधानसभा भंग करण्यासाठी राष्ट्रपतींकडे शिफारस करु शकतात. त्यामुळे राज्यातील आगामी हालचालींकडे लक्ष लागलं आहे.

 

 

 

COMMENTS